विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, २७ मार्च, २०१७

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केलं जातंय....🇮🇳


नवी मुंबईचे आयुक्त आणि अनधिकृत बांधकामाविरुद्ध जबरदस्त मोहिम राबवणारे एक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आदरणीय तुकाराम मुंढे साहेब यांची  तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आजपर्यंत अश्या अनेक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना यासारख्या बदल्यानां अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. एखादा अधिकारी किंवा व्यक्ती जर प्रामाणिक पणाने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असेल तर त्या व्यक्तीस आजूबाजूच्या स्वार्थी मंडळींकडून अश्या प्रकारचा त्रास देऊन त्याची बदली करण्यापर्यंत मजल जाते. खरंतर हा दोष या भ्रष्ट व्यवस्थेचा आहे. हि व्यवस्था बदलू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची जर अश्या पद्धतीने बदली करून जर खच्चीकरण केले तर पुढच्या नव्या पिढीपुढे कोणता आदर्श आम्ही ठेवतोय याचाही विचार सरकारने केला पाहिजे. जर अश्याच पद्धतीने चालत राहिले तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे काम करायचे कि नाही??? हा माझा सरकारला सवाल आहे. अनेक प्रामाणिक अधिकारी अश्या राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून बाहेर पडतात. प्रशासन आणि सरकार यांनी सामंजस्याने काम केले तरच जनतेचे प्रश्न सुटू शकणार आहेत. पण हल्ली राजकारण्यांना मान, सन्मान, मुजरा हवा असतो. तसेच आपण म्हणेल तसेच अधिकाऱ्यांनी वागले पाहिजे, बोलले पाहिजे, सही कर म्हणेल तिथे सही केली पाहिजे, आपण जनतेचे मालक आहोत असा दृष्टीकोन त्यांचा असतो. पण खरंतर लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत ही गोष्टच लोकप्रतिनिधी विसरून चालले आहेत. नव्हे नव्हे ते गेलेच आहेत. दिल्ली मध्ये सेना खासदाराने एका एअर इंडिया च्या व्यस्थापकाला इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसवल्याच्या कारणावरून चप्पलने मारहाण केली. कायदे बनवणाऱ्या संसदेचे संसदेचे सदस्य असताना तेच  कायदे बिनधास्त पणे मोडून हे लोकप्रतिनिधी काय साध्य करत आहेत?  आम्ही जनतेचे सेवक आहोत कि गुंड आहोत? हा प्रश्न कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे.
या लोकप्रतिनिधींना भ्रष्ट अधिकारी हवे असतात.  वर्षानुवर्षे  भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते यांची जी युती झाली आहे त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली आहे.
सरकारने  प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना काम करण्यास मोकळीक दिली तर ते नक्कीच चांगले काम करतील. हल्ली अश्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी  प्रयत्न होणे गरजेचे आहे.

✍पोपट यमगर
   आटपाडी, सांगली
7709935374

शनिवार, ११ मार्च, २०१७

अखेर मोदीजींच्या सब का साथ सब का विकास या धोरणालाच उत्तर प्रदेशची भक्कम साथ..


2019 मध्ये होणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशसह पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. त्यानुसार उत्तरप्रदेश सारख्या देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रभाव पाडू शकणाऱ्या या राज्यात भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह विजयी होत आहे. फक्त विजयीच झाली नसून 300 जागापेक्षा जास्त जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवत कमळ जोरात फुलले आहे. उत्तराखंडमध्येही कमळ चांगलेच फुलले आहे.  पंजाब मध्ये मात्र अकाली दलासोबतची युती त्यांना सत्ता वाचवण्यासाठी तारू शकली नाही. तिथे काँग्रेसने विजय मिळविला आहे. खरंतर या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांची प्रतिष्ठा खूप पणाला लावली होती. उत्तरप्रदेश मध्ये तर त्यांनी अगदी  शेवटच्या दिवसापर्यंत जो प्रचार केला होता त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतो आहे. उत्तर प्रदेश च्या निकालानंतर राज्यसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी जी आकडेवारी लागत होती तीही या राज्यातून मिळणार आहे. त्यामुळे अनेक  विधेयके हि लोकसभेत पास होऊन राज्यसभेत अडखळत होती त्या विधेयकाचा मार्ग आता मोखळा झाला आहे. येणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक साठीही स्पष्ट बहुमत भाजपकडे उपलब्ध झाले आहे.
केंद्रामध्ये सरकार येऊन भाजपला  तीन वर्ष होत आहेत त्या तीन वर्षातील सकारात्मक विकासकामांच्या जोरावर  भाजप  निवडूक लढवीत होता .  काळ्या पैशाच्या विरोधात नोटबंदी सारखा एक ठामपणे निर्णय घेऊन पारदर्शकतेचा मुद्द्यावर हि भाजपने भर दिला आहे. नोटबंदी नंतर होणारा त्रास जनतेने झेलूनही त्याचे दूरगामी फायदे अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांना होणार आहेत ह्या दृढ विश्वासाला  मतदारांनी साथ दिली आहे.
सर्वसामान्य लोकांच्या मनात एखाद्या नेत्याविषयीची  विश्वासार्हता असते ती खूप महत्त्वाची असते त्याआधारेच  मतदार त्या पक्षाला मतदान करत असतो. मला वाटते ती विश्वासार्हता मोदींजीनी मिळवली आहे आणि मतदारांच्या मनामध्ये  अजूनही ती टिकवुन ठेवली आहे,   ही भाजपच्या होणाऱ्या विजयावरून स्पष्ट जाणवते. मोदीजींची लोकप्रियता   स्थानिक पातळीवर  कायम आहे इतकेच काय तो वाढतहि आहे.  आज अनेक राज्यात गाव, शहर ते केंद्र यामध्ये भाजप सत्तेवर येत आहे. हे आपण महाराष्ट्रासह इतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालावरून स्पष्ट पणे दिसून येते.भाजपने स्थानिक पातळीवरील प्रचार आणि परिवर्तन रॅली आणि मोठ्या प्रचारसभामधील  करावयाची भाषणे  याची आखलेली रणनीती खूप महत्वाची ठरली.  मोदीजींनी अनेक रोड शो करत, जनतेत मिसळत मतदारांना सामोरे गेले.
उत्तरप्रदेश मध्ये सत्ताधारी मुख्यमंत्री  अखिलेश यादव यांची हार होण्याची सर्वात महत्वाची कारणे म्हटले तर गेल्या दोन महिन्यातील ताणला गेलेला कौटूबिक कलह,  आणि तिथल्या दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये केला गेलेला भेदभाव, ऐनवेळी काँग्रेस सोबत केलेली आघाडी हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
भाजपच्या विजयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे भाजप पूर्ण आत्मविश्वासाने निवडूक लढवत होती तो अभाव मात्र इतर काँग्रेस, सपा आणि बसपा कडे होता.  लोकसभेत आलेली मोदी लाट पुन्हा या पुढच्या लोकसभेसाठीच्या घेतल्या गेलेल्या सेमी फायनल मध्ये येणार का ??? अशी चिंता त्यांच्यात ठळकपणे दिसत होती. विरोधकासाठी एक अनुभव आला असेल तो म्हणजे  पराभव हा रणात नाही तर पहिल्यांदा मनात होत असतो याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या निवडणूका.....
येथून पुढील दोन वर्षाच्या कार्यकाळात मोदीजींच्या नेतृत्वाला आव्हान देईल असे सध्या तरी कोणतेच नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर दिसून येत नाही. तरीही भाजपाला खूप कार्यक्षमतेने  आणि पारदर्शकपणे कारभार करून जनतेचा विश्वास कायम ठेवावा लागणार आहे. शेवटी या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकापर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... आणि जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन सत्ताधाऱ्यावरती  विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा..

धन्यवाद..

✍✍पोपट यमगर

मंगळवार, ७ मार्च, २०१७

जागतिक महिला दिनानिमित्त



8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन...
             जागतिक महिला दिनाच्या सर्व माता, भगिनी, मैत्रिणी या सर्वांनाच सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा आहेत... त्या व्यक्त करत असताना समाजातील  महिलासंबंधीच्या काही प्रश्नावर चर्चा करणे  हे आपले कर्तव्य आहे .  माझ्या परीने हा विषय मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय.
    यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:
अर्थात ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो तेथे देवतांचे वास्तव्य असते आणि ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतात तेथे कोणतीही क्रिया सफल होत नाही... असं मानणारी आमची संस्कृती एवढेच काय तर संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.एका बाजुला संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात, टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या आधुनिक युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ?? ज्या  स्त्रीचा आपण सन्मान करत होतो त्याच स्त्रीवर आज अत्याचारासारख्या घटना का घडत आहेत??? स्त्रीयावरतीच बंधने का?? यासारख्या असंख्य प्रश्नाच्या मंथनातून  मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी  पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"

          देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच  बंदिस्त करायचं अश्या संकुचित प्रथाना स्त्रियांनीच आव्हान दिले गेले पाहिजे, असे मला वाटते आणि त्या देत आहेत याचाही नक्कीच मनात आनंद आहे.
            स्त्रीवाद हा विषय फक्त माहिलांशीच संबंधित न राहता तो पुरुषांशीही संबंधित आहे. स्त्रीचा विकासाचा संबंध हा  पुरुषांचा विकासाशी आहे.यामुळेच ज्या संधी पुरुषाला उपलब्ध आहेत त्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत हा वर्षानुवर्षाचा आग्रह आजही आहे. त्यासाठी अजूनही स्त्री लढते आहे, संघर्ष करते आहे.  आज अनेक स्त्री विषयी काम करणाऱ्या चळवळी देशात आणि जगात काम करत आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात जन्मताच मिळालेले हक्क इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेने नाकारल्यामुळे ते हक्क मिळविण्यासाठी प्रदीर्घ लढा देण्यासाठी झगडत असल्याचे आपणास दिसून येते. खरंतर भारत सोडून अनेक देशामध्ये मतदानाचा हक्क हि पुरुषांच्या बरोबरीने न मिळता त्यासाठी त्यांना संघर्ष करून तो मिळवावा लागला. याबाबतीत तुमच्या माझ्या देशाचं एक सुदैव म्हटले पाहिजे की इथल्या प्रत्येक स्त्रीला मतदानाचा अधिकार हा राज्यघट्नाकारांनी राज्यघटनेच्या चौकटीत पुरुषांच्या बरोबरीने दिला आहे.

            आज अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर काम करत आहेत. राजकीय क्षेत्रात हि स्त्री पुढे जाण्यासाठी धडपडते आहे. महिला आरक्षणामूळे अनेक ठिकाणी महिला या पदाधिकारी झाल्या पण त्यांना तिथंही स्वातंत्र्य मिळत नाही कारण तिथेही तिच्या कामात तिचा पती किंवा इतर नातेवाईक हस्तक्षेप करीतच असतो.त्यामुळे ग्रामीण भागात तर त्या महिलेपेक्षा तिच्या पतीलाच सरपंच म्हंटलं जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न मला पडतो??ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन  महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत घटकांचे काही प्रश्न,  शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली  पाहिजे.  शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील  महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
                आज भारतामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत आणि नंतर महाविद्यालयात   मुलींचे गळतीचे प्रमाण मुलांच्या पेक्षा खूप मोठे म्हणजेच दुप्पट आहे. यामागील कारणे ही खूप आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे मुलीवर शिक्षणासाठी जास्त पैसे खर्च करून काय उपयोग? पुढे तिच्या लग्नासाठीच्या पैशाचे काय??  कितीही केले तरी मुलगी हि परक्या घरची संपत्ती या सारखी खुळचट विचारांची प्रवृत्ती, वंशाचा दिवा (पणती नको पण दिवा पाहिजे) यासारखी अनेक कारणे आपल्याला  पाहायला मिळतील. आजही स्त्रीभ्रूण हत्या सारखी स्त्रीला मुळातूनच संपवण्यासारखी समस्या घडत आहे आणि ती वाढत हि आहे. दुर्दैवाने सांगावं लागते कि स्त्री भ्रूण हत्याही सुशिक्षित समाजात मोठ्या प्रमाणात घडत आहेत... मग आम्ही शिक्षण घेतले ते कशा साठी हा प्रश्न कुठेतरी मनालाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. तिला भीती आहे की कदाचित आईच्या उदरामध्ये तिला मृत्यु येईल व जरी जन्मले तरी तिचे रडणे हसणे हे कचराकुंडी मध्ये बंदीस्त होईल. आजही ती जन्मताच ती च्या लग्नाची काळजी  वडिलांना व्याकुळतेच्या दुर्गंधीमध्ये बुडवत असते. आजही तिला घराच्या बाहेर सात नंतर एकटे न पडण्याची सक्ती असते आणि पडलीच तर बाहेरील जगात असणाऱ्या गिधाडांच्या अत्याचारापासून  तिला सतत चिंता करावी लागते. आजही शिव्यांची लाखोली वाहताना हि तिच्या अब्रूची लक्तरे तोडली जातात, म्हणूनच कितीही कायदे करूनही निर्भयकांड ते कोपर्डी घटना सगळ्या देशाला हादरवून गेल्या पण त्यातून आपण किती शिकलो  हा खरंतर चिंतनाचा विषय आहे.

लेखाच्या शेवटी  मला आवडणारी  आणि भावलेली 'जगदंब' नावाची कविता  मला आपणाशी शेअर करायला आवडेल,

" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच का मरावं ?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती  सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती  धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापासकट लुटून तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको,   प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मादी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती,  ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।

✍✍पोपट यमगर
popatgyamgar.blogspot.com

गुरुवार, २ मार्च, २०१७

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स मध्ये या आठवड्यातील 'घराणेशाहीची गरज ' या विषयावर मी व्यक्त केलेलं माझं मत...

शेतकरी सुखी तर जग सुखी" हि संकल्पना सोशल मीडियाच्या संदेशामधून आपण दररोज वाचतो. भारतातील शेतकऱ्याला मुळात बाजारपेठेचे अज्ञान आहे या अज्ञानाचा फायदा घेऊन आजपर्यंत बाजारातील मधल्या दलालांनी अनेकवेळा शेतकऱ्याचे आर्थिक शोषण केले आहे. शेतकऱ्याचे सर्वात मोठे दुर्दैव असे आहे कि ज्यावेळी शेतकऱ्याचा शेतमाल शेतात असतो त्यावेळी त्याचे बाजार भाव जास्त असतात. आणि शेतमाल बाजारपेठेत विकण्यासाठी आणला असता त्या शेतमालाचे बाजारभाव व्यापाऱ्यांच्याकडून मुद्द्दामहून पडले जात जातात. भारतातील विविध पक्षांच्या कडून शेतकरी आणि शेती हा विषय नेहमीच सवेंदनशीलतेने मांडला जातो. अर्थात भारतातील सर्वात मोठा वर्गापैकी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्यास अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी शेतीमध्ये राब राब राबतो आणि शेतकऱ्यास त्यांच्या घामाचा मोबदला हि मिळत नाही हि सर्वात मोठं दुदैव म्हणावं लागेल. शेतकऱ्याला बाजारपेठेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे शेतकरी भरडला जात आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, हे वाक्य लहानापासून आपण विविध अभ्यासक्रमातून अभ्यासले असेल, वर्तमानपत्रातून वाचले असेल, विविध नामवंत वक्त्यांच्या भाषणातून आजपर्यंत अनेकवेळा ऐकले असेल. आज शेतकऱ्यास बँकेतून कर्ज घ्यायला गेला तरी तिथले अधिकारी हि शेतकऱ्यास वेठीस धरतात. शेतकऱ्यास बँकिंग प्रणालीची माहिती हि अपुरी असते. अशी सर्वकाही परिस्थिती असताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात शेतकऱ्याची पुढची शेतीतून बाहेर पडत आहे या स्वामिनाथन यांच्या मतांशी मी 100% सहमत आहे. लहानपणापासून मोठे होत असताना शेती मध्ये राब राब राबणारा आमचा शेतकरी बाप पाहिल्यावर आमच्या कोणत्या शेतकरी बापाच्या पोराला त्यांच्या बापासारखेच काबाड कष्ट करण्यासाठी शेती करावी वाटेल?? एवढे सारे काबाड कष्ट करूनही शेतकऱ्याला साधा त्याच्या घामाचा मोबदला हि भेटत नाहीच नाही वरून त्याने घातलेला उत्पादन खर्चही भेटत नाही ही सत्य वस्तुस्थिती आहे. आमच्या भारतातील शेतकरी बापाविषयी बोलले जाते ते म्हणजे भारतीय शेतकरी कर्जातच जन्मतो, कर्जातच जगतो, कर्जातच मरतो... अशी समोर परिस्थिती असताना कोणत्याही शेतकऱ्याच्या पोराला आपली पिढ्यांनपिढ्याची शेतीतील घराणेशाही पुढे न्यावी वाटणार नाही. सर्वच राजकारणी शेतकाऱ्याबद्दल निवडणुकां काळामध्ये खोटी आणि दांभिक सहानुभूती दाखवत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या पदरात काहीच पडत नाही . शेतकऱ्याला बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान फार कमी प्रमाणात दिसून येते. आज वकिलाच्या पोराला वकील, इंजिनियर च्या पोराला इंजिनियर शिक्षकाच्या पोराला शिक्षक व्हावेसे वाटते पण शेतकऱ्याच्या पोराला कधीच शेतकरी व्हावेसे वाटत नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्याच्या दारिद्र्याच्या अवस्थेत फार फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन विकून दुसरा व्यवसाय करण्याचा पर्याय निवडला आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रत्येक अधिवेशनात त्यावर खडाजंगी होत असल्याचे आपणा सर्वाना दिसून येते. पण कर्जमाफी सारखे वरवरच्या मलमपट्टीचे उपाय योजण्यापेक्षा त्या शेतकऱ्यावर कर्ज मागायची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजकारणातील घराणेशाही वाढत असताना शेतीतील घराणेशाही कमी होत आहे हा विरोधाभास आपल्या सर्वांच्या डोळ्यात चक्क अंजन घालून जातो. अर्थात जर भविष्यात अश्या पद्धतीने शेतीतील घराणेशाही कमी झाली तर संपूर्ण जगाला अन्न कोण पुरविणार ??? या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे.