रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

पोलिसांची वर्दी दर्दी होत चालली आहे का?*




महाराष्ट्राच्या इतिहासात सांगली जिल्हा हा राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली जिल्ह्यांनं महाराष्ट्राला वसंतदादा पाटील, आर आर (आबा) पंतगरव कदम, जयंत पाटील यांच्यासारखी मोठी नेतृत्व दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धा डझन मंत्री हे सांगली जिल्ह्याचे असायचे. पण आज त्याच सांगली जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक महत्व कमी झालं आहे. आम्हाला सांगली म्हटलं की एवढया मोठ्या नेतृत्वाचा जिल्हा म्हणून आठवतो पण मित्रांनो आज त्याच सांगली जिल्ह्याचं नाव गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात  पोलीस अधिकारी आणि काही पोलिसांनी अनिकेत कोथळे नावाच्या तरुणाला थर्ड डिग्रीचा वापर करून तसेच त्याला मारून  आंबोली घाटात जाळून टाकल्याप्रकरणी महाराष्ट्रात मीडियावर, वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. खरंतर या प्रकरणांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे त्याबरोबरच जनतेतील त्यांच्या विश्वासार्हतेला हे धोका निर्माण झाला आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय ' असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या पोलीस दलाला आज मात्र आपण नेमकं कोणाचे रक्षण आणि कोणाचे भक्षण करतोय हे प्रश्न विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सांगली जिल्ह्यानं आर आर पाटील (आबा)  यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि  प्रामाणिक गृहमंत्री या महाराष्ट्राला दिला आज त्याच आबांच्या जिल्ह्यात आणि त्याच पोलीस खात्यात अश्या पद्धतीचे नीच प्रकरण घडत आहे हे दुर्दैव आहे याची खंत सांगलीला जिल्ह्याला नक्की वाटते आहे. आज सांगली जिल्ह्यात चोरीचें, दरोड्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गुंडगिरीचे प्रमाण ही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी 9 कोटी हडप केल्याचे प्रकरण ही ताजे आहे. गुंडाकडून हप्ते घेण्याचे धंदे ही राजरोसपणे चालू आहेत. काही पोलीस अधिकारी तर त्यांच्या भ्रष्ट कारभाराची बातमी पेपरमध्ये छापली म्हणून संपादकाला धमकी देत आहेत. पांढऱ्या कपड्यातील गुंडगिरी करणारे नेते आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी यांचं साटलोट  जोरात चालु आहे.
खरंतर पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात पण एखादा सर्वसामान्य माणूस पोलिस ठाण्यात एखादी तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यालाच उद्धट पद्धतीने बोललं जातं.  त्याचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. साधे त्याच्याशी सभ्यतेने बोलत नाहीत, ही अनेक पोलीस ठाण्यातील वस्तुस्थिती आहे.
काही ठिकाणी तर भ्रष्ट आणि लाचार पोलीस अधिकारी आणि त्या भागातील नेते (खरंतर हेच गुंड असतात) यांच्या संगनमताने अनेक बेकायदेशीर व्यवहार चालतात. एखाद्या गुन्हयात त्या नेत्यांच्या कार्यकर्त्याला अटक केली तर लगेच तो गुंडप्रवृत्तीचा नेता फोनवरून पोलिसांना 'तो माझा कार्यकर्ता आहे , त्याला सोडा'    असे सांगीतल्याबरोबर तो पोलीस अधिकारी त्याला सोडतो, अश्या घटना घडत आहेत ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यामुळे हे भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीचें नेते यांच्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असणं गरजेचं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय स्वतःकडे गृहखाते ठेवून काय साध्य करू इच्छितात हे समजणे कठीण आहे. मला वाटतं, महाराष्ट्रातील संवेदनशील अश्या गृह खात्याला  स्वतंत्र गृहमंत्री मिळाला पाहिजे. आणि जी पोलीस दलात बेबंदशाही चालु आहे तिला कुठेतरी रोखणे शांततामय आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पानिपतच्या युद्धात  जसा विश्वास राहिला नाही असे म्हटले जाते तसेच सामान्य जनतेचा पोलीस खात्यावरचा विश्वास या प्रकरणामुळे  काही प्रमाणात गमावला आहे असेच म्हणावे लागेल. कोथळे मृत्यू प्रकरणात समावेश असलेल्या पोलीस अधीकारी आणि पोलीस यांना शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्यात मोठया ऑपरेशनची गरज आहे, नाहीतर गुंड प्रवृत्तीचे नेते आणि भ्रष्ट पोलीस यांच्यामुळे पोलीसांची वर्दी दर्दी झाल्याशिवाय राहणार नाही.

✍🏻प्रतीक गणपत यमगर
बाळेवाडी,
ता. आटपाडी, जि. सांगली
7709935374
📝Popatgyamgar.blogspot.com
📝https://pratikyamgar.wordpress.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा