विवेक विचार

विवेक विचार

सोमवार, २७ जून, २०१६

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेला वारीचा सोहळा आजपासुन सुरु होत आहे. त्या निमीत्ताने✍✍✍

               महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. महाराष्ट्रासारखी संतांची परंपरा लाभलेला भूप्रदेश जगाच्या पाठीवर अन्यत्र सापडणे अशक्यच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पर्यंत संतांची महान परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. "ज्ञानेश्वरे रचिला पाया। तुका झालासे कळस।।" या संतांनी आपल्याला केवळ ईश्वर भक्तीच शिकवली नाही तर मानवी जीवन उदात्तपणे जगण्याचे तत्वज्ञान त्यांनी महाराष्ट्राला शिकविले. आणि स्वतः तसे जगून दाखविले. वारीच्या माध्यमांतून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला, एकात्मतेची दिंडी निघाली, समतेची पताका खांद्यावर फडकली.  या संतांनी परकीय आक्रमणाच्या काळातही महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान याचे रक्षण केले.  एकीकडे संताच्या परंपरेतून निर्माण होणारा शुद्ध अध्यात्मिक भाव तर दुसरीकडे वीर पुरुषांच्या पराक्रमातून निर्माण होणारा वीर रस. यातून महाराष्ट्राचे एक अलौकिक व्यक्तिमत्व तयार झाले आहे.
                जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन  करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी होय. 'ग्यानबा तुकाराम' हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र होय. आषाढची एकादशी जवळ येऊ लागली की आमच्या मनात  पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ निर्माण होते. आणि मग "पाऊले चालती पंढरीची वाट " अशी स्थिती निर्माण होते. आज जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहुहुन प्रस्थान होते आहे तर उद्या मंगळवारी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहुन प्रस्थान होत आहे.  त्यामुळे येणारे 15 ते 20 दिवस अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीच्या ज्ञानसागरात समरस झालेला आपणास  दिसुन येईल.
                 मला माझ्या मनामधे विठ्ठल भक्तीची ओढ ही अगदी लहानपणापासुनच  लागली. याचं कारण म्हणजे  माझ्या घरी असलेली वारकरी सांप्रदायाची परंपरा अर्थातच माझी आई धार्मिक वृत्तीची असल्याने घरातूनच लहानपणी मला अध्यात्मिकतेची ओढ निर्माण झाली. तसेच आमच्या गावात जरवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम  सप्ताह। या सप्ताहामधे  ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. यामुळे सहावी सातवीत असल्यापासुन मला ज्ञानेश्वरी वाचनाची सवय लागली. सुरवातीला ज्ञानेश्वरी त्यातील भाषा अवघड(काही संस्कृत शब्द) असल्याकारणाने काहीच समजत नव्हते पण पुढे पुढे बारावीनंतर ती हळु हळु समजु लागली. त्या सप्ताहाच्या वेळी सादर होणारे गोड आणि मधुर आवाजातील अभंग माझे नेहमी लक्ष वेधून घेत होते.  कदाचित मला वाचनाची आवडही यातुनच निर्माण झाली असावी असं मला  वाटतं. आज अनेकांना (मलाही)  कधी कधी बोलताना, लिहीताना भाषण करताना ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खरंच मला तर नेहमी वाटत राहतं ते म्हणजे ज्ञानेश्वरी हाच महाराष्ट्राचा आद्यग्रंथ आहे. हा महाराष्ट्राचा आद्यग्रंथ अर्थातच विचार ग्रंथ जोपासण्याचा समाजात जगताना, वावरताना मनोमनी आपण प्रयत्न केला पाहिजे.
                या 20 दिवसाच्या चालणार्या वारी मधे लाखो वारकरी, हजारो दिंड्या सहभागी झाल्याचे आपणास दिसुन येतात. वारीच्या वाटेवर वारकरी हे नेहमी स्वयंशिस्तीने चालत असतो. अध्यात्म, एकात्म, भक्ती, भजन, अभंग यासारख्या अविष्कारातुन दिसणारी वारकर्यांची भावपुर्ण शिस्त तर दुसरीकडे वाटचाल, संयम, वारकर्यांचे परस्परांशी बोलणे, भोजन, कामाचे नियोजन, त्यासाठी योग्य व्यवस्थापन अशा स्वंयशिस्तीने प्रत्येक वारकरी हा वारी सोहळ्याशी बांधला गेला आहे.
लेखाचा शेवटही माऊलींच्याच एका गोड आणि  सुंदर अश्या अभंगाने करू इच्छितो .......,
              "अवघाचि संसार सुखाचा करीन।
                 आनंदे भरीन तिन्ही लोक।।
                जाईनगे माये तया पंढरपुरा।
                भेटेन माहेरा आपुलिया।।"

धन्यवाद।
✍✍✍✍✍✍श्री. पोपटराव यमगर
०७७०९९३५३७४
बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: