विवेक विचार

विवेक विचार

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स स्पर्धेत या आठवड्यातील विषय "अजून येतो वास फुलांना" या अग्रलेखावरती मी व्यक्त केलेले माझे मत........


भारताला जगातील सर्वात विशाल आणि विविधतापूर्ण  लोकशाही संपन्न असलेला देश  म्हणून ओळखले जाते.  भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते देशातील जनतेच्या सरक्षणासाठी, हितासाठी कायदे बनवणाऱ्या संसदेच्या निवडणुकांच्या मध्ये लोकांचे मत तयार करण्यापासून ते जनतेचा आवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. अर्थातच जनता आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमांनी काम करणे  गरजेचे आहे, यामुळेच लोकशाही बळकट होण्यास मदत होते. स्वातंत्र्य पूर्वकाळामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांनी दैनिक वृत्तपत्र,  साप्ताहिक, मासिकांच्या माध्यमांतुन ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्वातंत्र्यलढ्याची माहिती देशातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले.  आता स्वतंत्र भारतामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज, त्यांचे प्रश्न, सरकारच्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी आणि  राष्ट्रीय विकासाच्या पूर्ततेसाठी लोकांना प्रेरित करणारी असावी. तसेच लोकशाही व्यवस्थेला सदृढ बनविण्याची जबाबदारीही प्रसारमाध्यमांवर आहे असे मला ठाम वाटते.
             "देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असताना माध्यमे मात्र बदलास तयार नाहीत" हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे  वक्तव्य निश्चितपणे देशातील  माध्यमाना प्रमाणिकपणाचे मिळाले प्रमाणपत्रच आहे या लोकसत्ताच्या अग्रलेखाशी मी सहमत आहे.  देश बदलतो आहे, घडतो आहे हे १००% जरी  खरे असले तरी भारतासारख्या लोकशाही संपन्न असलेल्या देशात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यास  संरक्षण देण्याची प्राथमिक जबाबदारी हि सरकारची असते. देशातील सत्ताधारी सरकारच्या मताप्रमाणे प्रसारमाध्यमांनी वागणे हे लोकशाहीस बिलकुल अभिप्रेत नाही. जर सरकारचीच पाठराखण प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी केली तर माध्यमांनी सत्ताधाऱ्यांचे भक्तभाट झाल्याचे ते लक्षण आहे. सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर समाजात काय वास्तविक परिस्थिती चालू आहे, सर्वसामान्यांचे  सरकारच्या निर्णयावर काय मत आहे? हे जाणून घेणे कोणत्याही निपक्षपातीपणे काम करणाऱ्या  प्रसारमाध्यमांचे कर्तव्य असते आणि ते कर्तव्यच पार पाडण्याचे काम देशातील प्रसारमाध्यमे करत आहेत.  8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी  देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निश्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच माध्यमांनी व देशातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले होते. मोदिजीनी देशाच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने देशाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी कडक चहासारखा घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह असाच होता यामध्ये माझ्या मनात तरी  शंका नाही परंतु गेल्या महिन्याभरात सरकारकडून निश्चलीकरणाच्या निर्णयाची जी काही अंमलबजावणी केली गेली ती नक्कीच अपुरी अशीच होती.  8 नोव्हेंबर पासून  सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनात होणारा त्रास दररोज वाढतच गेला. अनेकांना तर मृत्यूला कवटाळावे लागले. मग हाच सर्वसामान्याना होणारा त्रास माध्यमांनी तुमच्या माझ्यासमोर मांडला, सरकारच्या कानावर घातला तर यात माध्यमांची चूक काय होती? आणि मला वाटते देशातील प्रसारमाध्यमे हि सर्वसामान्यांचे मतच जाणून घेत होती.    सर्वसामान्याना होणारा त्रास माध्यमांनी मांडायचा नाही तर मग कोणी मग कोणी मांडायचा???   निश्चलीकरणाच्या निर्णयाचे भविष्यात देशाला होणारे फायदे हि अनेक माध्यमांनी विशेष भागाच्या रूपाने देशातील जनतेसमोर निरपेक्षपणे  मांडले गेले हेही विद्यमान सरकारने पाहिले पाहिजे.  तसेच मोदीजींनी देशातील जनतेला कॅशलेस  व्यवहाराचं आव्हान केल्यानंतर माध्यमांनी कॅशलेस  व्यवहाराचे फायदे हि अप्रतिमरीत्या मांडले आहेत.  सरकारच्या मतानुसार खाजगी प्रसारमाध्यमे  सरकारविरुद्ध  मुद्दामच वातावरण निर्मिती करत आहेत असे वाटत असेल तर  सरकारी माध्यमांच्या द्वारे त्या खाजगी माध्यमांची सरकारने पोलखोल करावी.. पण असे न करता माध्यमाच्या नावाने ओरडणे हे माझ्या तरी मनाला पटत नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस च्या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार माध्यमांनी ज्या पद्धतीने दाखवले तसेच घोटाळेबाज सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यात माध्यमांची भूमिका हि भाजपला निवडुन येण्यासाठी खूप महत्वाची ठरली होती...   त्यावेळेस  अर्थमंत्री आदरणीय अरुण जेटलींना प्रसारमाध्यमे बदलल्याचा साक्षात्कार झाला नव्हता काय??  यामुळे भारतात सत्ताधारी बाकावर कोणता जरी पक्ष असला तरी सत्ताधारी   पक्षाची उत्तरे हि ठरलेली आहेत. सरकारने निश्चलीकरणाच्या निर्णयामुळे  सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी कसा होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे मला वाटते .
आज काही माध्यमात अभ्यासात्मक मुद्देसूद चर्चा न करता उतावीळ पणाने  नोटबंदीच्या निर्णयांवर चर्चा केली जात आहे.  21 व्या शतकात जर तुमच्या माझ्या देशाला आधुनिकतेकडे, महासत्तेकडे न्यावयाचे असेल तर माध्यमांनी सकारात्मक दृष्टीकोनातून निपक्षपातीपणे चालू घटनांवर भाष्य करणे गरजेचे आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार यांच्या  पर्यंत  माध्यमेच पोहचू शकतात. यामुळे लोकशाहीचे चारही स्तंभ ज्यावेळी हातात हात घालून निरपेक्षपणे कार्य करतील त्याचवेळी डाँ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांच्या स्वप्नातील  सक्षम आणि सशक्त असा महासत्ता भारत आकाराला  येईल असे मला वाटते.

धन्यवाद
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. : आटपाडी
जि. सांगली
7709935374

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

💐मोठे मात्तबर सहकार सम्राट जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोटाबंदी वरून एवढे चिंतीत का???💐




प्रत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे. परंतु हल्ली आमच्या सहकार सम्राट झालेल्या मात्तबर नेत्यांनी
मात्र सहकार या शब्दाची पूर्ण व्याख्या बदलून सहकार म्हंणजे सर्व संचालक एकत्र येऊन त्याच्या  संगनमताने शेतकऱ्यांनी ठेवलेल्या ठेवी या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वाटून खाऊ अशी केली आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर सहकाराचा स्वाहाकार केला आहे.
सहकारी संस्थांना आर्थिक दु:स्थितीच्या खाईत लोटणारे पदाधिकारी गब्बर झाले आहेत. त्या संपत्तीचा व प्रतिष्ठेचा वापर करून त्यांनी अन्य संस्थामध्ये मानाचे स्थान मिळवून ते दिमाखाने मिरवताहेत. सहकारी साखर कारखान्यातून धनाढय़ झालेले काही महाभाग हाच कारखाना मोडीत काढला तर खासगीत विकत घेण्याचीसुद्धा तयारी दर्शवतात. राज्यातील बहुतेक जिल्हा सहकारी बँका वर्षानुवर्षे सहकार क्षेत्रातील यांच्या कारनाम्यावरून बदनाम झाल्या आहेत. या सर्व कारनाम्यामुळे
केंद्र सरकारने सहकारी बँकाना ५०० आणि १००० च्या नोटा घेण्यास घातलेली बंदी  हि १००% बरोबरच आहे. आदरणीय अर्थमंत्री अरुण जेटलीजी यांनी सांगितल्या प्रमाणे जर या बँकांना ५०० आणि १००० च्या नोटा घेण्यास परवानगी दिली तर राज्यासह देशातील मातब्बर नेत्यांनी गोरगरीब जनतेला लुटून मिळविलेला काळा पैसा  पांढरा करणाऱ्या एजन्सी ठरतील. हे विधान मला १०० % बरोबर आहे असे वाटते. कारण देशाच्या रिझर्व्ह बँकेने या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकासह सर्व सहकारी बँकांना वेळोवेळी  सांगितलेल्या सल्यांचे  आणि सूचनांचे कोणतेही पालन केलेलं दिसून येत नाही.  रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये या सहकारी बँकावरती अनेक ठपके ठेवले आहेत. या सहकारी बँकांचा इतिहास समोर ठेऊन रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय योग्यच आहे असे मला वाटते.  
पहिला आणि तांत्रिक मुद्दा म्हणजे या बँकांनी खातेदाराचे KYC आणि Core Banking  पूर्ण केलं नाही आणि त्याचं प्रमाण हि फार कमी आहे. यानंतर दुसरा आणि  सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या बँकाच्या संचालक मंडळाचे गाजलेले घोटाळे.. भ्रष्टाचारी कारभार, संगनमताने भ्रष्टाचारी नोकरीभरती,   त्यामुळे बंद पडलेल्या बँका, पतसंस्था, सहकारी साखर कारखाने यामध्ये हजारो गोरगरीब शेतकरी आणि कामगारांच्या,  ठेवीदारांच्या बुडालेल्या ठेवी या सर्व अंदाधुंदीच्या कारभारामुळे या सहकारी बँकांची बँकिंग क्षेत्रामध्ये व समाजामध्ये विश्वाससार्हता किती आहे ???  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सरकारला प्रशासक का नेमावे लागतात????  अनेक सहकारी बँका या मात्तबर प्रस्थापित नेत्यांच्या आहेत हे सर्वानाच माहिती आहे, मग या मात्तबर नेत्यांच्याकडे असलेला काळा पैसा या सहकारी बँकाच्या माध्यमातून पांढरा कशावरून करणार नाहीत????   गोरगरीब शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना सहकाराच्या नावाने अनेक मात्तबर नेत्यांनी लुबाडून आपली घरे भरून घेतली आहेत. आज अनेक मोठमोठे उदयॊग सहकाराच्या नावाने चालतात पण याची खरी मालकी हि या मात्तबर नेत्यांचीच असते.  या अश्या मातब्बर नेत्यांनाच आज केंद्र सरकारने सहकारी बँकाना ५०० आणि १००० नोटा घेण्यास घातलेली बंदी हि उठवायला है असे वाटत आहे. हे सर्वच पक्षातील नेते (याला कोणताही पक्ष अपवाद नाही) आज जिल्हा मध्यवर्ती बँकांवर घातलेल्या बंदीमुळे शेतकरी  आणि कामगारांच्या नावाने गळे काढत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये अनेक शेतकरी बांधवांची खाती आहेत पण ती फक्त पीक कर्ज आणि पीक  विमा यांचा लाभ या खात्याच्या माध्यमातून मिळतो यासाठीच आहेत. संचालक मंडळाच्या भ्रष्टचारामुळे या बँका कधी डबघाईला जातील याची कोणतीही सुतराम शक्यता नसल्याने  शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हे या बँकात ठेवी ठेवायला धजावत नाहीत, हि अनेक सहकारी बँकांतील वस्तू स्थिती आहे. या सहकारी बँकाच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, शेतकरी देशोधडीला लागला आहे  अशी ओरड या सहकार सम्राटांच्या कडून चालू आहे. सहकारी बँकाच्या संचालकांनी अनेक सहकारी साखर कारखाने संगनमताने मोडून खाल्ले त्यावेळी शेतकरी देशोधडीला लागला नाही का ?? कित्येक पतसंस्थांमधील ठेवी बुडाल्याने सर्वसामान्य ठेवीदार देशोधडीला लागला नाही का??? जिल्हा बँकांत भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारला गेला त्यावेळी शेतकरी देशोधडीला लागला नाही का???  जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरतीमध्ये  घोटाळा करून आपल्या पै पाव्हण्यांना नोकरभरती करतांना शेतकरी देशोधडीला लागला नाही काय??      असे अनेक प्रश्न आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात आहेत. आज राष्ट्रीयकृत बँका या परिसरातील अनेक गावामध्ये पोहचल्या आहेत.  या राष्ट्रीयकृत बँकामध्ये प्रधानमंत्री जनधन योजने च्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेने आपली खाती काढली आहेत. त्यामुळे या  राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकरी नोटा बदलून घेत आहेत आणि  ठेवीही ठेऊ लागले आहेत. येणारे काही दिवस आमच्या शेतकऱ्यांना  त्रास नक्कीच होईल पण भविष्यात याचे परिणाम चांगले होणार आहेत. आणि खरं सांगायचं तर आमच्या शेतकऱ्यांना हा त्रास काही नवीन नाही. 12 महिने शेतकरी त्रासच सहन करत आहे त्यावेळी होणारा हा त्रास या सहकार सम्राटाना  दिसत नाही का???जिल्हा  सहकारी बँकांवर  500 आणि 1000 च्या नोटा बंदी केल्यामुळे होणार त्रास मात्र पटकन आणि जलदगतीने दिसला. मित्रांनो खरी अडचण आणि सर्वात मोठा त्रास हा  सहकाराच्या नावाने राजकारण करणाऱ्या या मात्तबर नेत्यांना  निर्माण झाला आहे.  या मातबर सहकार सम्राट नेत्यांची आणि त्यांच्या बगलबच्यांची फार तडफड चालू आहे ही बंदी हटविण्यासाठी....   त्यामुळे त्यांच्याजवळ असणारा काळा पैसा या सहकार सम्राटांना बदलता येत नाही आणि काळा पैसा बाहेर काढताही  येत नाही, अशा दुहेरी संकटात हे सहकार सम्राट सापडले आहेत.  या मुळे ग्रामीण भागातील जर काळा पैसा बाहेर काढायचा असेल तर केंद्र सरकारने सहकारी बँकांना घातलेली बंदी कदापि उठवू नये असे माझे ठाम मत आहे.

धन्यवाद..
श्री.  पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
०७७०९९३५३७४
p

माणदेशाचं लोकनृत्य : गजनृत्य(गजीढोल)




महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा  प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह  महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रसिद्ध आहे. माणदेशाला  गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. माणदेशातील सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर आटपाडी माण खटाव सांगोला माळशिरस जत कवठे महांकाळ या तालुक्यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात  खेळला जातो. अनेक गावोगावी वाड्या वस्त्यावरती  गजी ढोल मंडळाचे  ताफे  अस्तित्वात आहेत.
गजीढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात.  गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात.ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल  उडवत डाव्या-उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल  व विजार किवां धोतर घातलेली असा असतो.  अनेक ठिकाणी गजनृत्याला  चुळण असेही म्हटले जाते.
गजीढोलात नृत्य करणारे गजी अनेक प्रकारे गजीनृत्य करतात. नृत्यात ढोलाच्या आणि सनईच्या सुरावर पावलांचा संबंध जोडला जातो. नृत्य करताना गुणगुणणे चालू असते. त्याला ढोलाची साथ असते. ढोलवादक समुहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा  येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यामुळे उत्साह निर्माण होतो. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ-दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. एक घाय बारा ते पंधरा मिनिटे चालते. नृत्य तीन तास चालत असते.
अनेक लोकनृत्याप्रमाणे  गजीढोल हा नृत्यप्रकार हि फार जोशपूर्ण असा आहे. तो फक्त पुरुष मंडळी सादर करतात. ग्रामीण महाराष्ट्रातील यात्रा, जत्रा, सप्ताह, भंडारा, वालुग, दिवाळी , दसरा, यासह अनेक महत्वाच्या कार्यक्रमा च्या ठिकाणी  गजनृत्याचे  सादरीकरण केले जाते. चपळता, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्ध असा तो नृत्यप्रकार असल्याने गजीढोल या नृत्याची रचना वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. गजीढोल खेळत असताना चांगभलं चा तसेच यळकोट यळकोट जय मल्हार' असा मुक्त जयघोष केला जातो. एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण वातावरणात केलं जाणारं जोमदार गजनृत्य! आरेवाडी  परिसरातल्या अशा एका चैतन्यपूर्ण गजनृत्याचा पथकाचा समावेश दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचालनात करण्यात आला होता, आणि परदेशातही  ते सादर करण्याची संधी त्या कलाकारांना मिळाली होती. हि नक्कीच आनंदनीय अशीच बाब म्हणावी लागेल. आमच्या आधुनिक शिकलेल्या पिढीने माणदेशाची हि लोकनृत्य कला समजावून घेतली पाहिजे.  हल्ली लग्नाच्या वरातीमध्ये डॉल्बीच्या तालावर बेधुंदपणे   झिंगाट होऊन नाचणारी तरुणाई पाहतो त्यावेळी  मला या पूर्वी च्या लग्नातील वरातीमध्ये नाचणारी गजी ढोल पथके आणि लेझम पथके आठवतात. मित्रानो गजिढोल हि आपल्या समाजाची परंपरा आहे. ती काळाच्या ओघात इतिहातात दडप होऊ नये हीच छोटीशी अपेक्षा......।

श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी ता आटपाडी
7709935374

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स मध्ये या आठवड्यातील 'गहिरी हवा' या दिल्लीतील हवा प्रदूषणासारख्या गंभीर विषयावर मी व्यक्त केलेलं माझं मत...



21 व्या शतकाच्या जगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे माणसांच्या विकासातील प्रमुख साधन असणार आहे. हे खरे आहेही पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जो मानव जातीचा विकास होणार आहे तो शाश्वत आणि आरोग्यपुर्ण विकास असेल याची मात्र शाश्वती देता नाही. भारताच्या प्रमुख महानगरांमधील गेल्या काही दिवसापासून वाढत असलेले हवा प्रदूषण नक्कीच भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला नक्कीच भूषणावह नाही. भारताची राजधानी दिल्ली मध्ये गेल्या अनेक वर्षातील हवा प्रदूषणाचे सारे उचांक मोडीत काडत तिथली परिस्थीती प्रदूषित हवेमुळे गंभीर अशी झाली आहे. अनेक शाळा सार्वजनिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. या दिल्लीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास हवेच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेली दिल्लीसारखी परिस्थिती उद्या भारतातील बाकीच्या शहरामध्ये हि भविष्यात उदभवण्यास वेळ लागणार नाही.
           भारतात वाढत जाणारे औद्योगिकीकरण हे एका बाजूला विकासाचे ध्योतक जरी मानले जात असले तरी या औद्योगिकीकरणामुळे वाढत जाणारे हवा आणि पाणी प्रदूषण हे मात्र तुमच्या, माझ्या आणि या देशातील नागरिकांच्या आरोग्याला नक्कीच परिणाम करणारे असेच आहे. हवा प्रदूषणामुळे ओझोन वायूचा थर हि दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. तेल अविव येथील संशोधकांनी, हवेच्या प्रदूषणामुळे हृदयाच्या झटक्यासोबत दीर्घ काळ जडणाऱ्या हृदयरोगांचा आढावा घेतला आहे. प्रदूषित वातावरणात वास्तव्य असलेल्या लोकांना तुलनात्मकदृष्टय़ा हृदयविकाराचे वारंवार झटके येत राहतात.
           मानवास जी गोष्ट सुखासाठी उपभोग्य आहे त्या गोष्टीचा उपभोग हा मानव कधी कधी अतिरेकीपणाने करतो त्या उपभोग्य वस्तूंचा उपभोग अतिरेकीपणाने केल्यामुळे मानवी जीवन आणि आरोग्य संपुष्ठात आल्याचे मात्र तो जाणीवपूर्वक विसरून जातो. भारतामध्ये दररोज खाजगी वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतामध्ये नुकतीच दिवाळी होऊन गेली पण या दिवाळीमध्ये उत्साह आनंद आणि जल्लोषाच्या नावाखाली फटाक्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण नक्कीच तुम्हा आम्हाला विचार करायला लावणारे असेच ठरले. दिल्ली सरकारने पाठीमागे वाढत्या हवा प्रदूषणास आला घालण्यासाठी सम विषम चा केलेला प्रयोग नक्कीच चांगला होता असे मला वाटते. भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी हवा प्रदूषण हि एक प्रमुख समस्या निर्माण झाली आहे. आपले भारतीय नागरिक हि आपण केलेल्या हवा प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करण्यास तयार नाहीत.
           भारतामध्ये एक वर्ग मोठ्या प्रमाणात उदयास येताना दिसतो आहे तो म्हणजे समाजात काही झाले तरी त्याची संपूर्ण जबाबदारी हि सरकारवर ढकलून सरकारवर टीका करायला मोकळा होतो. देशात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांवर लक्ष ठेवणे हि सरकारची जबाबदारी असते हे खरे आहे परंतु एक भारतीय नागरिक म्हणून तुमची माझी एक जबाबदारी असते कि देशात प्रदूषित वातावरण निर्माण होऊ न देणे. सरकारने दिल्लीमध्ये झालेल्या हवा प्रदूषणावर अल्पकालीन अश्या उपाययोजना न करता दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्या सारख्या प्रत्येक सुजाण आणि सुशिक्षित नागरिकानीही आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या निरोगी आणि आनंदी जीवनासाठी देशात हवा आणि पाणी प्रदूषण होणार नाही यासाठी गांभीर्याने वर्तमानकाळात वर्तन करणे काळाची गरज आहे. जर खरंच आपण अश्याप्रकारे आचरण करू शकलो तरच खऱ्या अर्थाने भारत हा स्वच्छ भारत होण्यास वेळ लागणार नाही.

धन्यवाद.
श्री. पोपट यमगर

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

दिपावलीच्या सर्वाना कोटी कोटी शुभेच्छा

आजपासून सगळीकडे दिवाळीची धामधूम चालू होत आहे. दीपावली हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घरात अंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून म्हणजेच आजपासुन होते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा हि नक्कीच अविस्मरणीय अशीच आहे.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करून देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते. बहीण भावाला ओवाळत असतानाच "ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येउ दे" असे म्हणते. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा बळीराजा... सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग.. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा......बळीराजा... आणि त्याच बळीचे राज्य म्हणजे न्यायाच, समतेचं, कष्टकरी शेतकऱ्यांचं, गोरगरीब जनतेचं राज्य यावे म्हणून हि आपली भगिनी लाडक्या भावाला ओवाळताना बळीचे राज्य येउदे अशी प्रार्थना करत असते.
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. अशी हि येणारी दिवाळी आपल्या सारख्या सर्व प्रेमळ मित्रांना
आनंदाची सुखाची, समाधानाची, यशाची जावो हीच मनापासून सदिच्छा....
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
दिपावलीच्या पुनश्च एकदा आपण सर्वाना कोटी कोटी शुभेच्छा

..अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात माझ्याही लेखणीतुन उमटलेले विवेक प्रहार....


The Most Powerfull Man in The World असा उल्लेख ज्या राष्ट्राध्यक्षांचा संपुर्ण जगभरात केला जातो त्या महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या शेवटच्या टप्यातील पडघम  वाजत आहेत. गेली वर्षभर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चाललेली प्रक्रिया अंतिम टप्यात म्हणजेच दोन तीन आठवड्यावरती येऊन ठेपली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचा ४६ वा राष्ट्राध्यक्ष  कोण निवडला जाणार याकडे लागले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये हि राष्ट्राध्यक्षपदाची सरळ लढत होत आहे. हिलरी क्लिंटन या अत्यंत बुद्धिमान, आपल्यापुढे असलेल्या विषयाचा मुद्देसूद अभ्यास करणाऱ्या म्हणून  आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखल्या जातात. तर दुसऱ्या बाजुला डोंनाल्ड ट्रम्प हे आक्रमक स्वभावाचे आणि स्पष्ट वक्ते म्हणून आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखले  जातात. त्यांनी आक्रमकपणे केलेली अनेक विषयावरची वक्तव्ये हि वादग्रस्त आहेत. अमेरिकेच्या २०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अमेरिकन  पक्षाची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी हिलरी क्लिंटन यांना मिळाली आहे.  सध्याच्या तरी मतदानाच्या आकडेवारीवरून त्या आघाडीवर असल्याचे आपणास पाहायला मिळतात. २००८ च्या जागतिक महामंदीचे परिणाम आर्थिक महासत्ता  असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सर्वप्रथम सहन करावे लागले होते.  त्यानंतर संपूर्ण जगभर जागतिक महामंदी विस्तारली गेली.  लोकसत्ताचे संपादक गिरीशजी कुबेर सर यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे केलेले सडेतोड विश्लेषण "ओपन अमेरिका" या लेख मालिकेच्या  माध्यमांतून लोकसत्ता मध्ये गेले महिनाभर प्रकाशित होत होते. जवळ जवळ त्यांनी लिहिलेले सर्वच लेख अमेरिकेच्या निवडणुकीविषयीची माहिती मिळण्यास  उपयुक्त ठरले. दोन्ही उमेदवारांच्या अमेरिकन मीडियाने घेतलेल्या चर्चेच्या  वादफेऱ्या, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांची चर्चेत झालेली गोची, उपाध्यक्षपदासाठी उभे असलेले दोन्हीही नवखे उमेदवार, अमेरिका आणि  भारत यांच्या तील निवडुकाविषयीचा मुद्देसूद तुलनात्मक आढावा इत्यादी विषयीचे लेख नक्कीच अप्रतिम असेच आहेत. खरंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हि अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असते. जितके  मतदार मतदान करतील तितकी मते असे साधे सरळ गणित नाही. प्रत्येक राज्याला स्वतःचे वजन असते. उदा--टेक्सास, न्यूयॉर्क, फ्लोरिडा. या राज्यांना स्वतःचे वजन आहे. जितके त्या राज्यातील लोकप्रतिनिधी तितके त्या राज्याल वजन. आपले उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात, म्हणून राष्ट्र्पतींच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकांच्या मताला वजन ४८... या पद्धतीमुळे उमेदवारही वजनदार राज्यांकडे जास्त लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे जसे एकटा उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो, तसे इथे टेक्सास, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियासारखे वजनदार राज्य निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. यासारखे अनेक मुद्दे हे "ओपन अमेरिका" या लेख
मालिकेच्या माध्यमातून समजले.


धन्यवाद..
श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि.: सांगली

आटपाडी तालुक्याविषयी भाग 2 ...... : तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण....


काल आपल्या आटपाडी तालुक्याविषयी लिहिलेल्या शैक्षणिक विषया संबधीच्या लेखाला आपल्या सारख्या सुशिक्षीत आणि जागृत वाचकांच्या कडुन खुप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपुर्वक धन्यवाद मानतो. आजचाही लेख कसा वाटला जरुर कळवा.. काही चुका उणिवा असतील तर तसंही सांगा. त्यामधे नक्कीच दुरुस्ती केली जाईल.
भौगोलिक दृष्ट्या सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला असणारा आणि वर्षानुवर्षे कायमच दुष्काळाने पिचलेला तालुका अशी ओळख सांगली जिल्ह्यात आटपाडी या तालुक्याची आहे. सांगली जिल्हा तसा राजकारण्यांचा जिल्हा म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा, राजाराम बापु, माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या लोकप्रिय नेत्यांचा जिल्हा....महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अर्धा डझन मंत्री फक्त सांगली जिल्ह्यातीलच असायचे. पण आटपाडी तालुक्याच्या जनतेला इतिहासात भौगोलिक, आर्थिक दुष्काळाबरोबर राजकीय दुष्काळही कायमच सहन करावा लागला आहे. तालुक्यात फक्त दोनच आमदार होऊन गेले ते म्हणजे सन्माननीय माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख आणि सन्माननीय माजी आमदार आण्णासाहेब लेंगरे......... या दोन्ही नेत्यांच्या शिवाय तालुक्यातील अजुन कोणताही नेता आमदार होऊ शकला नाही ही बोचरी खंत तालुक्यातील जनतेच्या मनामधे आहे. यानंतर मागील चार वर्षात सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सन्माननीय अमरसिंह देशमुख यांना मिळाले होते. त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद स्वर्गीय मोहनकाकांना मिळालं होतं. तालुक्याच्या नेतृत्वांना जिल्हा स्तरावर मिळालेल्या या काही मोजक्या संधी आपल्याला ठळकपणे दिसुन येतात.
1995 ला अपक्ष म्हणुन आमदार झालेल्या सन्माननीय राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी युती सरकारला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राजेंद्रआण्णांना युती सरकारकडुन मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.. मंत्रीपद झुगारुन पाणीप्रश्न सोडवा म्हणणारा नेता या तालुक्याला लाभला आहे.अपक्ष आमदारांच्या दबावामुळे युती सरकारने टेंभुचा नारळ फोडला, काही प्रमाणात कामे झाली, पण या योजनेकडे पुढे आघाडी सरकारच्या कार्यकाळात राजकीय दुर्लक्ष झाल्यामुळे त्या योजना पूर्ण न झाल्याने पाणीप्रश्न हा पुढेही तसाच प्रलंबित राहिला. राजेंद्र आण्णांची पाण्याच्या प्रश्नाविषयीची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही माणगंगा सहकारी साखर कारखाना , सूतगिरणी त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखविली आहे. दुष्काळी भागातील सामान्य माणसांची पत निर्माण करुन बाबासाहेब देशमुख बॅक काढण्याचे आणि ती यशस्वीपणे चालविण्याचे कार्य सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अमरसिंह देशमुख यांनी केले आहे. अनेक गरजुंना या बॅकेने आधार दिला आहे.दुष्काळी भागातील गोरगरीब शेतकर्यांना दररोजच्या दुग्ध व्यवसायातुन पैसा मिळावा यासाठी दुधसंघ स्थापन केला व तो आज अतिशय वेळच्या वेळी योग्य दराने दूध उत्पादकांना दुधाचे पैसे देऊन व्यवस्थितरित्या तालुक्यातील दुध व्यवसायाला चालना मिळत आहे. या दोन्हीही नेत्याचं एक अपयश म्हणजे तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजेच टेंभुच्या पाण्याचा प्रश्न ते त्यांच्या कार्य काळात सोडवू शकले नाहीत...
आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आमदार अनिलभाऊ बाबर यांचे खंदे समर्थक आणि माजी जि. प. सदस्य तानाजी पाटील आणि स्वर्गीय रामभाऊ पाटील यांचे बंधु भारततात्या पाटील यांचे स्वतंत्र असे राजकीय गट आहेत. यांनीही तालुक्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे. गेल्या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत या गटांनी आपले वेगळे राजकीय अस्तित्व दाखविले. या दोन्हीही नेतृत्वाकडुन तालुक्याचं हित होणं अपेक्षीत आहे.
काॅग्रेसचे नेते स्वर्गीय मोहनकाका यांनी तालुक्यात त्यांना मिळालेल्या विविध पदाच्या माध्यमातुन विकासकामे करत तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या जाण्यानं तालुक्यात काॅग्रेसचं अस्तित्व कमी झालं आहे.
2009 पुर्वी तालुक्यात पक्षापेक्षा गटा तटांचे राजकारण चालत होतं. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील तसेच तालुक्याच्या राजकारणातील मा. गोपीचंद पडळकर या युवा नेत्याचा प्रवेशाने गटा तटांचे राजकारण संपुष्टात आणले. गेल्या आठ वर्षात आटपाडी खानापुरसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब काम करत आहेत. शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी प्रंसगी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. 2009 ची विधानसभा, 2012 ची करगणी जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा निवडणुकीत त्यांना नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला. तरीही "जिंकलो तरी भुलणार नाही, हरलो तरी खचणार नाही, जनतेचे शिलेदार आम्ही, लढणे कधीच सोडणार नाही" असे म्हणत त्यांचा संघर्षाचा प्रवास चालुच आहे. गोपीचंद पडळकर या नेतृत्वाकडुन तालुकावासियांना खुप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची अपेक्षापुर्ती कशी करतात त्यावरच त्यांचं पुढील राजकारण अवलंबुन असणार आहे.
तालुक्याच्या या प्रमुख नेत्यासह दिघंचीचे माजी सरपंच हणमंतराव देशमुख, करगणीचे माजी जिप सदस्य आणासाहेब पत्की, माजी जिप सदस्य, माजी सभापती विजयसिंह पाटील, धुळा मारुती झिंबल यांच्यासह विविध भागातील स्थानिक पातळीवरच्या पदाधिकारयांचा तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा सहभाग असल्याचे आपणास दिसुन येते.

धन्यवाद।।
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. : सांगली

आपल्या आटपाडी तालुक्याविषयी माझ्या लेखणीतुन उमटलेले विवेक प्रहार


आटपाडी म्हणजे प्रभु श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडी च्या श्री सिद्धनाथाची ही भूमी, थोर साहित्यिक ग.दि माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, ना.स. इनामदार या थोर साहित्यिकांची भूमी.., एका तराळाच्या पोरानं कर्तृत्वाच्या जोरावर अवघं अंतराळ काबीज केलं त्या साहित्यीक कुलगुरु शंकरराव खरातांची जन्मभूमी. लालभडक आणि चविष्ट आणि गुणवत्तापुर्ण अशा डाळिंबांची भूमी.....अशी कितीतरी वैशिष्ट्य आपल्या आटपाडीची आहेत.
आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेला आपल्या वाट्याला आलेला भोग आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये म्हणुन शिक्षणावर भर दिल्याशिवाय पर्याय उरत नाही.प्रतिकुल भौगोलिक, आर्थिक परिस्थितीतही या तालुक्यातील युवक युवती भविष्यातील सुखाची स्वप्न पाहत यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी ही पिढी सदैव सज्ज असेल यात कोणतीच शंका नाही.
तालुक्यातील मोठ मोठ्या पदावर पोहचलेल्या अनेकजणांच्या शैक्षणिक जडणघडणीमधे आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे महत्व अबाधित असेच आहे. सन्माननीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी दुष्काळी भागातील गोरगरीब व सर्वसामान्य तरुणांनी सुशिक्षीत होऊन स्वतःच्या पायावरती उभं रहावं यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या परिश्रमाने मजबुत पाया उभारल्यामुळे नावलौकिकास आलेली ही शिक्षण संस्था दिवसेदिवस विस्तारतच आहे. आज या संस्थेतुन जरवर्षी हजारो विद्यार्थी (केजी पासुन पीजी पर्यंत) शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. आटपाडीच्या शैक्षणिक विकासात इतर अनेक संस्थानी आपला महत्वाचा वाटा उचलला आहे.त्यामधे झरे येथील अहिल्यादेवी शिक्षणसंस्था, आटपाडी येथील श्री राम एज्युकेशन सोसायटी खरसुंडीतील रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय, धुळाजीराव झिंबल शिक्षण संस्था, यासह अनेक गावातील छोट्या मोठ्या शाळांचा यामधे समावेश होतो. खरंतर कोणत्याही भागाचा सर्वांगीण विकास हा त्या भागाच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबुन असतो. विकास असतो. शैक्षणिक विकास झाल्याशिवाय आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक विकास होत नाही ही वस्तस्थिती आहे. आपल्या तालुक्यातील, समाजातील मुलांमुलींनी शिकावं, शिकुन मोठ्या पदावरती विराजमान व्हावं हे प्रत्येकालाच वाटतं याचा आनंद आहे. समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपण करिअरविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा राबविल्या पाहिजेत. भविष्यात शिक्षणाच्या जोरावरच येथील युवक युवती आकाशाला गवसणी घालुन तालुक्याचा नावलौकिक वाढवतील यामधे माझ्या मनात तरी कोणती शंका नाही...
धन्यवाद..

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

.... तिमीरातुनी तेजाकडे जाणारा संघर्षमय प्रवास ..... .... .....


           


सांगलीच्या राजकारणात स्वतःच एक वेगळं वलंय निर्माण केलेले, गेल्या दहा वर्षात खानापुर आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्याच्या विरोधात आवाज उठवत विस्थापीत झालेल्या बहुजन समाजाची मोट बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने अनेक नामवंत राजकारण्यांना घायाळ करणारे भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस.... वाढदिवसाच्या निमीत्ताने प्रथमतः माझ्यावतीने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत. सांगलीच्या राजकारणात (लोकसभेला आणि विधानसभेला) आपण किंगमेकर ठरलाच आहात पण येणारया काळात सांगलीच्या राजकारणात आपण किंग व्हावं हीच मनापासुन सदिच्छा आहे...
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे उमेदवार म्हणुन खानापुर आटपाडी मतदारसंघात ज्या झंझावत अशा पद्धतीने आपण निवडणुक लढविली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे..समोर आर्थिक सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित असलेल्या तीन उमेदवारांना तुमची उमेदवारी आणि तुम्ही मिळविलेली मते ही नक्कीच सणसणीत चपराकच ठरली. 2007 च्या जि. प. निवडणुकीपासुन ते आजपर्यंत तुमचा जो संघर्षमय, खडतर, काटेरी वाटेवरील अनवाणी प्रवास असा जो राजकीय प्रवास आहे तो नक्कीच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल... मी तर याला तिमीरातुन तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणु इच्छितो... खरंतर गोपीचंद पडळकर हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं, पाहिलं, वाचलं ते म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी फक्त 15-20 दिवस अगोदर. .... तिथुन ते आजपर्यंत खुप कौतुकास्पद आसाच प्रवास आहे. सांगलीच्या राजकारणाच्या इतिहास ही राजकीय विश्लेषकांना ही गोपीचंद पडळकर या नावाशिवाय पुर्ण करताच येणार नाही. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झंझावत पद्धतीने प्रचार करुन पहिल्याच निवडणुकीत किंगमेकर ठरलात. त्यांनतर टेंभुसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने, ओगलेवाडी टेंभु कार्यालय तोडफोड प्रकरण, मंत्र्याना तालुक्यात येण्यास बंदी, राजेवाडी पोट कालवा प्रकरण, दुष्काळी परिषदा यासह विविध माध्यमातुन जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमाणसात रुजविली. त्यानंतर 2012 मधील जि. प. पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवत तालुक्यात दुसरया क्रंमाकाची मते मिळवत तानाजी शेठ यमगर यांच्या रुपाने एक पंचायत समिती सदस्यही निवडुन आणला..
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ग्रामपंचायत निवडणुकात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या..एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालु असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकर्यासाठी, कामगारांसाठी, गोरगरीब, दीनदलीत जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालुच होती. माझासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतुन आणि कर्तृत्वातुन दाखवुन दिलं. राजसत्ता आणि राजपाठ कधी मागुन मिळत नसतो तर तो हिसकावुन घ्यायचा असतो असं सन्माननीय जानकर साहेबांच्यानंतर आपणच बहूजन पोरांना ठामपणे ओरडुन सांगितलं. अनेकजण जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकर ची भुमिका विसरलेही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणुस मात्र कधीच विसरणार नाही. कि आपल्या राज्यात दुसरया क्रंमाकाचा असणारा धनगर समाज डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठी भारताच्या स्वांतत्र्यापासुन ते आजपर्यंत गेली 68 वर्ष रस्त्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातुन रस्त्यावरती उतरत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही आपण अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली आहेत. अजुनही आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही तोही प्रश्न आपण तत्परतेने लक्ष घालुन लवकर निकाली काढावा हीच राज्यातील तमाम समाजबांधवाची मनस्वी मागणी आहे.
खरंतर बोलण्यासारखं बरंच आहे. जर कोण चांगले काम करत असेल त्याला पाठिंबा देणं, कौतुक करणं आणि कोण चुकतही असेल तर त्यांची चुकही निपक्षपातीपणे दाखवुन देणं हे एक लेखकाचं काम आहे. आज आपला भारतीय जनता पार्टी हा पक्ष राज्यात, केंद्रात सत्तेवर आहे. आपल्याकडुन तमाम सांगलीकर यांच्यासह खानापुर आटपाडीकर यांच्या खुप सारया अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी माझ्यावतीने तुम्हाला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्माचं दान, भिष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जाणतेपण देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...आणि
पुनश्च एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

धन्यवाद
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
०७७०९९३५३७४

पाकिस्थानने उरी येथे भारतीय लष्करावर हल्ला केल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच्या कडुन ज्या पद्धतीने पावले उचलली जात आहेत ते नक्कीच अभिनंदनीय अशीच आहेत असंच म्हणावं लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी केलेलं एक दमदार भाषण नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्थानला एकाकी पाडणार असंच आहे. सन्माननीय सुषमा स्वराजजी यांनी दहशतवाद्यांना पाकिस्थान कश्या पद्धतीने पोसतोय आणि त्यासाठी जगातील सर्व मानवतावादी राष्ट्रांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकजूट होण्याचं आव्हान केलं. त्याच दिवशी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिंधु पाणी वाटप करारातील भारताच्या हिश्याला आलेलं सर्व पाणी भारत वापरेल असा निर्णय घेऊन पाकिस्थानला कृतीतुन पहिला टोला दिला. त्यांतर पाकिस्थानातील इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेतल्यामुळे भारतीय उपखंडातील बांगलादेश अफगाणिस्थान भुतान नेपाळ यांनीही भारताच्या निर्णयाला पाठिंबा देत इस्लामाबादमध्ये होणारया सार्क परिषदेमधे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इस्लामाबादमधे होणारी सार्क परिषद रद्द होत आहे अशी बातमी येत आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे काल भारतीय लष्कराने LOC पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले... जरवेळी भारतावर हल्ला झाल्यानंतर निमूटपणे सहन करत निषेध करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नव्हतो. परंतु खरंच राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर भारतीय लष्करहि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देते हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे. भारतानं पुढे जाऊन अजून एक पाऊल उचलले आहे ते म्हणजे most favoured nation पाकिस्थानला दिलेला दर्जा भारत कडून घेत आहे...
भारत या सर्व घटना पाहता भारतही एक सशक्त देश म्हणुन पावलं उचलतो आहे याचा तुम्हाला मला अभिमान आहे.. आम्ही जात पात, धर्म, भाषा, प्रांत, पक्षीय राजकारण यापलीकडे जाऊन आमच्यात किती जरी वेगवेगळे वाद विवाद असले तरी भारतावर म्हणजेच आमच्या मायभुमीवर ज्यावेळी दुसरा देश हल्ला करतो त्यावेळी आम्ही 'हम सब भारतीय है' म्हणत एकत्र येऊन त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे भारतानं दाखवून दिलं आहे.. त्याबद्दल भारत सरकार आणि भारतीय लष्कर यांच मनापासुन अभिनंदन... येथून पुढे भारतावर हल्ला करताना पाकिस्थानला किंवा त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना विचार करावाच लागेल... याच बरोबर या सर्जिकल स्ट्राइक च्या ऑपरेशन नंतर भारतावर हि खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे

कदाचित पाकिस्थान भारतातील प्रमुख शहरावरती हल्ले करू शकतो.. त्यासाठी आपण सर्वानी राष्ट्रीय सुरक्षततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद ... 

 पोपट यमगर

07709935374

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांची जयंती।।त्यानिमीत्त..............

आज कर्मवीर भाऊराव पाटील(आण्णा) यांची जयंती।।त्यानिमीत्त प्रथमतः यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।।
माझं जवळ जवळ अर्ध शिक्षण आण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत झालं यांचा मला आनंद वाटतो. कारण शिक्षण घेत असताना रयत शिक्षण संस्था कधीच परकीय संस्था वाटली नाही. संस्थेत शिक्षण घेत असताना आपुलकी प्रेमच मिळाले संस्थेत शिक्षण घेत असताना आण्णां सारख्या महापुरुषांच्या आदर्श चारित्र्याचे धडे मिळत गेले आणि त्यातुनच माझं हे व्यक्तीगत चारित्र्य घडत गेले. आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्राचं अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी बाजारीकरण करुन टाकलं आहे. पैसे घेऊन जशा बाजारात वस्तु मिळतात तशा अनेक खाजगी विद्यापीठ संस्थामधुन पदव्या मिळत आहेत. आज छोट्या मुलांच्या केजी ला प्रवेश घ्यायला 50000 फी मागितली जाते. या आर्थिक कारणासाठी अनेक गोरगरीब पालकांना आपल्या मुलास दर्जेदार शिक्षणापासुन वंचित ठेवावं लागतं ही मनाला बोचणारी खंत आहे. पण मी ठामपणे सांगु शकतो की माझं संस्थेतील शिक्षण हे खुप कमी खर्चात झालं आहे .
आणांनी रयत शिक्षण संस्था चालु करण्यामागचं खरं उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण घेता यावं हे होतं. स्वतः आण्णा फक्त सहावी शिकले आहेत पण त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेतुन लाखो कोट्यावधी मुलांनी पदव्युत्तर पदव्या घेतल्या आहेत.
आण्णानी 4 ऑक्टोंबर 1919 रोजी कार्ले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 1919 ला रयत शिक्षण संस्थेच्या नावाने लावलेला वेल आज गगणाला गवसणी घालताना आपल्याला दिसुन येतोय. संस्थेच्या नावाप्रमाणेच ही रयतेची म्हणजेच गोरगरीब, दलीत, सर्वसामान्य, वंचीत, शेतकरी, कामगार यांची संस्था आहे असं आण्णानी अनेक वेळा बोलुनही दाखवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा शिकण्याची इच्छा असणारया गरजु विद्यार्थ्यासाठी आण्णानी कमवा आणि शिका ही योजना संस्थेत चालु केली. संस्थेतील अनेक शाखामधे बाहेरगावच्या वंचित विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे चालु केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य असं सांगतांना आण्णांनी संस्थेचं चिन्हसुद्धा वटवृक्ष ठेवलं आहे याचं कारण म्हणजे वटवृक्षाप्रमाणे संस्थेच्या शाखाचा विस्तार होत जावो हीच त्यांची मनोमनी इच्छा होती.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी कर्मवीर आण्णांच्या विषयी पुढील गौरवोदगार काढले आहेत, "कर्मवीर ही व्यक्ती नव्हती ती एक संस्था होती, बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले. त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे." सार्वजनिक शिक्षणाबाबत आज सरकारी पातळीवर निर्णय झालेले आहेत. पण एक काळ असा होता की त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशा काळात मागासवर्गीय बहुजन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर केले. कष्टकरी विद्यार्थ्यांना रात्रशाळांचा पर्याय उपलब्ध केला. खेड्यातील मुलांना दैनंदिन सुविधा मिळाल्या तर त्यांना शिक्षण घेता येईल या विचारातून त्यांनी मोफत वसतीगृहे चालवली. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या रूपाने त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली. त्यांच्या जयंतीदिनी त्यांचा आदर्श न विसरण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन।
धन्यवाद।
पोपट यमगर

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

वार्ता विघ्नाची नुरवी



गेले वर्षभर आम्ही जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याची ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे.
संध्याकाळ होणार आणि सूर्यास्त झाल्यावर अंधारच पडणार, हे भौगोलिक सत्य आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीतही, उद्याची पहाट नक्की उगवणार या एकाच जाणिवेने आम्ही आश्वस्तही असतो. पण गेले वर्षभर आम्ही अस्वस्थ आहोत. चिंता आणि काळजीची मनावर धरलेली काजळी दिवसागणिक घट्ट घट्ट होत आहे. उद्याची पहाट उगवेल ना, उगवली तरी, नंतर सूर्योदय होईल ना, ती सोनेरी किरणे सकाळी नवा उत्साह घेऊन येतील, की नवेच काही तरी अप्रिय समोर ठेवतील, या काळजीने प्रत्येक रात्रीच्या अंधारात आमची मने दडपून जात होती. काही तरी चांगले, थोडे फार मनासारखे, आणि अधूनमधून तरी काही हवेहवेसे घडेल, एवढीच आमची अपेक्षा होती. अर्थात, सारे काही छान छान, अच्छे अच्छे दिवस असावेत, असं आमचं म्हणणंच नाही. जगण्याचे सारेच क्षण सुखाने ओसंडून वाहू लागले, तर माणूसपण त्यात हरवून जाईल, हेही आम्हाला माहीत आहे. म्हणूनच, आमच्या अपेक्षाही फार मोठय़ा नव्हत्या. दररोजचा नवा दिवस साऱ्यांना किमान समाधानात साजरा करता यावा, संकटे आली तरी ती पेलवण्याची शक्ती प्रत्येक पाठीच्या कण्यामध्ये असावी अशीच आमची अपेक्षा होती. पण तसे फारसे घडलेच नाही. प्रत्येक दिवस नवी अस्वस्थता, नवी निराशा सोबत घेऊनच जणू उजाडत राहिला. नव्या दिवसागणिक नव्या संकटाचे सावट मनामनावर दाटलेलेच राहिले. असुरक्षिततेच्या, असहायतेच्या ओझ्याखाली दडपून जगणारी मने, मोठी स्वप्नेदेखील पाहू शकत नाहीत. तेवढी त्यांची कुवतच राहात नाही, हा अनुभव आम्हाला काहीसा अस्वस्थ करीत राहिला आणि त्या दडपणाखालीच आम्ही आमचे सरते वर्ष वाया घालविले.
तू आमचा पिता आहेस, त्राताही आहेस. भवदु:खाचे डोंगर समोर उभे राहिले की तुझ्या केवळ स्मरणाने त्यावर मात करण्याची िहमत मनावर स्वार होते, ही आमची श्रद्धा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही असंख्य दगडधोंडय़ांना ठेचकाळलो आणि प्रत्येक कळ जणू जीवघेणी होती. त्या त्या क्षणी आम्हाला तुझीच आठवण आली होती.
जगण्याची आणि संकटे झेलण्याची आमची उमेद आम्ही हरवलेली नाही. अशी असंख्य संकटे आली तरी ती पेलण्याची आमची तयारी आहे. आमचे तुझ्याकडे एकच मागणे आहे. ते म्हणजे, संकटे झेलण्याची, त्यांच्याशी लढण्याची आणि ती परतवून लावण्याची शक्ती तूच आम्हाला दिली पाहिजे. हे आमचे तुझ्याकडे हक्काचे साकडे आहे. तू संकटमोचक आहेस, तू सुखकर्ता आहेस. तू सोबत असताना कोणत्याही संकटाचे सावटदेखील आसपास असू नये अशी आमची भावना आहे. म्हणूनच, गेले वर्षभर आम्ही जे जे काही भोगलं, ते आता आम्ही दहा दिवसांच्या उत्साहात विसरून जाणार आहोत आणि तुला निरोप देताना, या यातना, संकटे आणि त्यामुळे मनांभोवती आवळलेले निराशेचे फासही आम्ही तोडून विसर्जति करून टाकणार आहोत. नव्या वर्षांत आम्हाला नव्या संकटांशी भक्कमपणे लढण्याचे बळ हवे आहे. ती ताकद आमच्या मनांना तुझ्याकडून मिळावी एवढीच आमची प्रार्थना आहे. आमच्या भक्तीचा तो पारंपरिक वारसा कदाचित आज हरवत चालला असेल. या भक्तीवर नव्या जगाच्या नव्या संस्कृतीची अप्रिय पुटे चढलीही असतील. पण त्याखालची आमची भक्ती मात्र, आजही पारंपरिक भक्तीएवढीच पारदर्शक आहे. तुझ्या मिरवणुकीसमोरची बेभान आणि क्वचित बीभत्सही वाटणारी आमची नृत्ये आणि त्यासाठी वाजविले जाणारे संगीत भक्तिभावाशी पुरते विसंगत आहे, हे आम्हाला मान्य आहे. तुझ्या दहा दिवसांच्या उत्सवकाळात आम्ही आमच्या परंपरांपासून लांब चालल्याचाच पुरावा मिळतो, हेही आम्हाला मान्य आहे. पण आमची भक्ती आणि तुझ्यावरची श्रद्धा मात्र, तेवढीच निखळ आहे. त्याचा स्वीकार कर. नव्या वर्षांत विघ्नाची वार्ता न उरावी, हीच आम्हा भक्तांची भाबडी भावना आहे.

.(.दैनिक लोकसत्ता अग्रलेख )

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त...................


आज भारताला स्वातंत्र्य मिळून 69 वर्ष झाली. आज पुर्ण देशभर 70 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारताच्या स्वांतत्र्यासाठी अनेक स्वांतत्र्ययोद्धे झटले, झगडले, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन देशाच्या संसाराचा गाडा हाकला, भावी पिढयांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे व्हावे यासाठी इंग्रजांशी संघर्ष केला, कित्येक क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले, हसत हसत फासावर गेले... या सर्व भारतमातेच्या थोर सुपुत्रांना माझ्याकडुन स्वातंत्र्य दिनानिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन..
आज 70 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारताच्या 69 वर्षात घडलेल्या कौतुकास्पद घडामोडी आणि जागतिक पातळीवर समग्र भारताचा एक शक्तिशाली राष्ट्र म्हणुन होत असलेला उदय नक्कीच तुमच्या माझ्या मनात आनंद निर्माण करणारी गोष्ट आहे. सध्याच्या वर्तमान भारताचा अभ्यास करत असताना पाठीमागील घडामोडी चा आढावा घेत आपण भारताच्या भविष्याकडेही ध्येयासक्त नजरेनं पाहतोय..
मित्रांनो आज भारत हा जगात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे उद्याच्या भारताचं भविष्य तुमच्या माझ्यासारख्या नवतरुणांच्याच हातात आहे. अशा वेळी मला आठवतात ते
स्वामी विवेकानंदजीचे ते स्फुर्तीदायी शब्द... "जा सारया जगाला (मंगलमय) स्वरात सांगा, ही पुण्य पुरातन भरत भू पुन्हा एकदा जागी होत आहे"
या एका वाक्यावर चिंतन, विचार करावा तितका कमी आहे. भारत नक्कीच खडबडुन जागा होत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक चढ उतार बेरजा वजाबाक्या करत आपण आज या ठिकाणापर्यंत पोहचलो आहे. सध्या जगात संस्कृतींचा संघर्ष चालु आहे....त्या संस्कृतींच्या संघर्षामधे तुमच्या माझ्या हजारो वर्षाची दीर्घ परंपरा असलेल्या भारतीय संस्कृतीकडे जगाचं लक्ष लागलेले आहे. मानवतेचा, एकतेचा, विविधतेतुन एकात्मतेचा, समृद्धीचा असा आपला इतिहास आहे. हा गौरवशाली इतिहास जोपासण्यासाठी व भविष्यातील सर्वमावेशक समृद्धीसाठी आपल्याला काही कठोर अशी छोटी छोटी पाऊले उचलावी लागणार आहेत..ती पावले भविष्यकाळात सर्वांना सोबत घेऊन आपण आपल्या कृतीच्या माध्यमातुन टाकली पाहिजेत असं मला वाटतं.
सध्या केंद्रात सकारात्मक सरकार सत्तेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला सर्वसमावेशक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगातील एक स्वयंपूर्ण देश आहे. 21 व्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या शतकात भारत जगाच्या नकाशावर नेतृत्व करण्यासाठी पुढे सरकत आहे. हे वर्षापुर्वी गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेल्या सुंदर पिचई यांच्या उदाहरणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपण उद्योग , क्रीडा, शिक्षण, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातही गरुडभरारी घेत आहोत. स्त्रीयांनीही त्यांना मिळणारया दुय्यम वागणूकीला व
फक्त चुल आणि मुल या मुलभुत चौकटीला बगल देऊन अनेक क्षेत्रात केलेली प्रगती ही निश्चीतच उल्लेखनीय आहे. (उदा. पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी सनदी अधिकारी किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बॅकेच्या मुख्य अरुधंती भट्टाचार्य इ.) याचाच अर्थ आपण विजयाच्या (दिवंगत डाॅ. कलाम साहेबांनी पाहिलेल्या जागतिक महासत्तेच्या) दिशेने वाटचाल करत आहोत.आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज संपुर्ण जग भारताकडे एका आशेने पाहत आहे. इतकी विविधता असलेला भारत देश एकसंघ आणि एकात्मक कसा राहु शकतो यावर अनेक राष्ट्रामधे अभ्यास चालु आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण केलेली राज्यघटना/भारतीय संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासुन झाली. आज एवढी विभीन्नता असुनही भारत एक दिसतो आहे हे फक्त राज्यघटनेचेच द्योतक आहे.
आपल्या भारताच्या समोर अजुनही काही समस्या आणि आव्हाने आ वासून पुढे उभे आहेत. उदा. लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, पर्यावरणाचा नाश, नक्षलवाद, दुष्काळ, भ्रष्टाचार, स्त्रियांवरचे अत्याचार, जातीयवाद यासारख्या काही समस्यांचा अजुनही आपल्याला सामना करावा लागत आहे.
या सर्वच समस्या, आव्हानावरती उपाय काढण्याचं कार्य केंद्रामधे सकारात्मक दुरदृष्टीकोन असलेलं सरकार अखंड अविरतपणे करत आहे. मी भारतीय म्हणुन जेव्हा आपण कार्य करु त्यावेळी समग्र भारताच्या दृष्टीने तो
नक्कीच आनंदाचा दिवस असेल असं मी मानतो.
मी शिवाजी विद्यापीठात होतो त्यावेळी एनसीसी भवन मधे एक खुप छान गाणं लागायचं
"हम सब भारतीय है " खरंच किती प्रेरणादायी गीत आहे आणि हे प्रेरणादायी गीत ऐकतच आपले जवान कोणताही भेदभाव न करता सीमेवरती लढत आहेत. ज्यावेळी सर्व भारतीय नागरिक हम सब भारतीय है हे गीत म्हणत कार्य करतील त्यावेळी नक्कीच भारत हा महासत्ता झालेला आपल्याला दिसुन येईल। आपणासही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच दिवशी देशाची आठवण येऊ न देता दररोज अखंडपणे एक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणुन छोट्या छोट्या गोष्टीमधून देशकार्य केलं पाहिजे. म्हणून भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी आपण आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावं हीच 70 व्या स्वातंत्र्यदिनी सदिच्छा। तुम्हा सर्व बंधु आणि भगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा।
शेवटी एवढेच म्हणेन,
"हेचि दान देगा देवा। भारतीयत्वाचा विसर न व्हावा॥"
जय हिंद।
श्री. पोपटराव यमगर
(बाळेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374

मंगळवार, १९ जुलै, २०१६

गुरुपौर्णिमेनिमीत्त मनाच्या गाभाऱ्यातून.... ✍✍✍✍✍✍

                 आज आषाढी पौर्णिमा अर्थातच भारतामध्ये गुरु पौर्णिमा म्हणून  साजरी केली जाते.  गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. .....आज आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.  आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच महत्व गुरूंना आहे.  गुरूंच्या मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे खूप महत्वाचे  आहे. ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्यांच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडतं. जे  आपल्याला अडचणीच्या वेळेस योग्य मार्गदर्शन करतात. लढण्यासाठी ऊर्जा, उमेद देतात, आपल्यामध्ये  आत्मविश्वास निर्माण करतात.  जर  आपल्या आयुष्याचा रस्ता चुकत असेल तर योग्य दिशा देण्याचं  काम करतात ते आपले गुरु होत. प्रथम मी माझ्या आई वडिलांना गुरु मानतो. ज्यांनी मला हे सुंदर जग दाखविले. ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले.  ज्यांच्यामुळे माझं या जगात अस्तित्व आहे त्या माझ्या आई आणि वडिलांना मी माझे प्रथम गुरु समझतो.
                  आईवडिलांच्यानंतर  मी वाचलेल्या पुस्तकांनाच माझा गुरु समजतो. त्यांनीच मला विचार करण्याची दृष्टी दिली. अन्याय अत्याचारा विरुद्ध व्यक्त होण्यासाठी लेखणी म्हणून  शस्त्र हाती दिले. पुस्तकांनीच देशाची अनादिकालीन संस्कृती, माती आणि गौरवशाली इतिहास समजावून सांगितला आणि त्यातूनच तो अभिमानास्पद इतिहास सांगण्याचं कौशल्य प्रपात झाले, याचा मला मनोमनी आनंद आहे.  अर्थात आयुष्याच्या शेवटपर्यंत खूप समग्र वाचनाची इच्छा आहे. वाचनाची भूक कधीच  भागणार नाही हे ही त्रिवार सत्य आहे.  या बदलत्या आधुनिक जगात  जगायचं  कसं हे पुस्तकांनीच सांगितले.यानंतर मला माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत अनेक आदर्श शिक्षक अर्थातच गुरु मला भेटत गेले. त्यांनी दिलेले  ज्ञान  याचा आयुष्याच्या प्रत्येक  वाटेवर त्याची  राहील. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त जन्माची खरी सार्थकता कशी सिद्ध कराल  ह्याचे मार्गदर्शनही आपले गुरूच करतात. अशा शाळेपासून ते विद्यापीठापर्यंतच्या अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर आपण जातो तेव्हा खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांनाही आणि आपल्यालाही मिळते . आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक अर्थातच गुरु हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.

✍✍✍✍✍✍✍✍ पोपटराव यमगर
07709935374

सोमवार, १८ जुलै, २०१६

********कोपर्डीतील धुमसणारया सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध माझ्या लेखणीतुन मांडलेले सणसणीत आणि झणझणीत विवेक प्रहार .....✍✍✍

अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका नववीत शिकणार्या मुलीवर पाच हरामखोर नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन अतिशय निघृण पद्धतीने तिच्या शरीराचे हालहाल करत तिची हत्या केली. ही बातमी वाचली, ऐकली, पाहिली आणि मन सुन्नच झाले. विचारांच काहुर माजलेल्या सैरभैर डोक्यामधे मेंदु धुमसत राहिला, आणि त्या धुमसणार्या मेंदुतुन छोट्या भगिनीवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आपण आपली लेखणी उचलली पाहिजे असं मनाच्या गाभार्यातुन वाटलं म्हणुन लेखणी उचलली आणि त्या लेखणीतुन सणसणीत निघालेले प्रहार तुमच्यासारख्या संवेदनशील सुशिक्षीत आणि सुसंस्कृत वाचकांसमोर मांडत आहे.
                      संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे. पण सध्याच्या काही घटना (कोपर्डीसारख्या) पाहिल्या की मान शरमेने खाली जाते. तुमच्या माझ्या या संस्कृतीनं महान आसणार्या राज्यात, देशात स्त्रियावर होणारया अत्याचाराचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण नक्कीच माझ्यातरी मनावर घावच घालुन जाते. आणि मग मनातुन काही हुंकार उमटत राहतात ते म्हणजे आमच्या या लिंगपिसाट झालेल्या हरामखोर नराधमांना नेमकं झालंय तरी काय??? जर खरंच यांना मर्दुनकीचा इतकाच घंमड आणि गर्व असेल तर या लिंगपिसाट झालेल्या हरामखोरांची मर्दानकी शांत करण्यासाठी छत्रपतींचाच कलम कायदा अंमलात आणावा लागेल. छत्रपतींच्या स्वराज्यामधे "स्त्री वर हात उचलणार्याचे म्हणजेच छेडछाड बलात्कार करणार्याचे हातपाय कलम केले जातील" असा सक्त आदेश होता. या आदेशासमोर सगळेच समान होते. हा आदेश गावच्या रांझ्या पाटलाने मोडला म्हणुन त्याचे हातपाय कलम केले गेले. आज घडत असलेल्या घटनावर सुद्धा आजच्या सरकारने छत्रपतीचे हे कलम अंमलात आणले पाहिजे असं माझं ठाम मत आहे.
                       आपल्या असल्या पौरुष्यार्थामध्ये असलेल्या नालायकीने आई-बापाला मान खाली घालायला लावण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? हिजड्यासारखं वागणं आणि बोलणं असणारे हे कसले मर्द? मुलींना आचकट विचकट अश्लील बोलण्यात आणि छेडण्यात कसली आलीय मर्दानगी? ... मर्द तर ते होते ज्यांनी स्वतःचे जीवन राष्ट्राचे जीवन बनवले. देशासाठी, समाजासाठी, अखंड आयुष्य वेचले. अत्यंत नितीमान जीवन जगत राजा असतांनाही राज्याचा उपभोग न घेता केवळ रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजीराजे मर्द होते. आपली ही अनादीकालीन भारतीय संस्कृती ही जगभरामधे पोहचविणारे स्वामी विवेकानंदजी मर्द होते, रोज मरणप्राय यातना सोसत औरंग्याच्या अमिषांना लाथाडुन मृत्यूवर विजय प्राप्त करणारे संभाजीराजे मर्द होते. स्वतःचे तारुण्य क्रांतिच्या लढ्यात भिरकावून देणारे, अनेक सुंदर सुंदर तरुणी मागे लागल्या असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यासाठी तारुण्य खर्च करत हसत हसत फासावर जाणारे भगतसिंह, सुखदेव, राजगुरु मर्द होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजाना टक्कर देणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्द होती. चहुबाजुंनी कौटुंबिक दुःखे कोसळत असतानाही माळव्यावर सल्लग तीस वर्ष राज्य करणार्या लोकमाता अहिल्यादेवी मर्द
होत्या असे असंख्य मर्द या भारताच्या मातीत जन्मास आले. या तमाम मर्दांच्या कर्तृत्वाने पावन झालेली ही भुमी सध्याच्या हुल्लडबाज आणि लफडेबाज युवावर्गामुळे कलंकीत होत आहे. व्यसनाधीन, वासनांध, पाश्चात्यांच्या भोगवादी अश्लील संस्कृतीच आकर्षण, मुलींना आचकट विचकट बोलणं, गुंडगिरी अशा बिघडणार्या तरुणाईला या देशाची माती आणि इतिहास गालाखाली सणसणीत चपराक देऊनच सांगावाच लागेल. आपल्यासारख्या नवयुवकांनी आपली ही माती आणि माता समग्र बुद्धीने समजाऊन घेतली पाहिजे. आणि जर कोणी नराधम चुकीचे वागत असल्यास तिथेच ती प्रवृत्ती ठेचुन काढली पाहिजे आणि पुन्हा त्याचं स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडसही झालं नाही पाहिजे. समाजातील चांगली माणसंच कोपर्डीसारख्या घटना भविष्यात रोखु शकतील. नाहीतर सरकारने कितीही कठोर कायदे केले तरीही ही अमानुष प्रवृत्ती सहजासहजी थांबेल अशी सुतराम
कोणतीही शक्यता नाही. अशा घटनांच्याबद्दल मुळात समाजातुनच जागृती हवी आहे आणि जर आपणासारख्या सुशिक्षीत आणि सुसंस्कृत युंवकांनी ती समाज जागृतीची
मशाल हाती घेतली तरच उदयाचा वैभवशाली आणि अत्याचारमुक्त चांगला समाज उभा राहु शकेल असं मला वाटतं.

धन्यवाद...
✍✍✍✍✍✍पोपटराव यमगर
आटपाडी, सांगली
०७०९९३५३७४

सोमवार, ११ जुलै, २०१६

........... ........... ........... जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने ........... ........... ........... ...........


                      आज ११ जुलै. म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन आहे. सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. आज वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, वाढती गुन्हेगारी, ढासळणाऱ्या पर्यावरणाचा असमतोल यामुळे कमी होणारी वने, जंगलतोड, वाढते स्थलांतर असे आजचे चित्र दिसत आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. वाढती लोकसंख्या ही भारताच्या आर्थिक विकासातील मोठा अडथळा आहे. दिवसेंदिवस लोकसंख्येचे वाढत जाणारे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे.
                      भारतामध्ये लोकसंख्या वाढीची कारणे अनेक आहेत.  दारिद्र्य असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. एकीकडे घरात दोनवेळच्या अन्नासाठी धडपडत असताना दुसरीकडे त्याच कुटुंबात वाढत्या मुलांचे प्रमाणही काळजाचा ठोका चुकवून जाते.  त्या कारणांचा शोध घेण्यासाठी गेले असता पुढील कारणे नक्कीच मनामध्ये स्पष्टपणे दिसून येतात.   निरक्षरता, भारतीय समाजात असणाऱ्या काही अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, दारिद्र्य, वंशाला वारस (दिवा) म्हणून मुलगाच हवा यासारख्या वेडपट समजूती यासारख्या कारणामुळे भारताची भरमसाठ लोकसंख्या वाढत आहे, वाढते आहे.  यातील वंशाला वारस अर्थातच दिवा मुलगाच हवा यासाख्या कारणामुळे तर मनात चीडच  येऊन जाते आणि धुमसणाऱ्या मनाला एक प्रश्न पडतो तो म्हणजे वंशाचा दिवा(मुलगा) लावण्यासाठी पणती(मुलगी) हवी का नको??  जर पणतीच नसेल तर दिवा लावणार कसा???   २१  व्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या शतकात जगत असतानाही आम्हाला वरील कारणांना सामोरे जावे लागते हे नक्कीच तुमचे माझे दुर्दैव आहे.
                    जागतिक महाशक्ती म्हणून आपला देश पुढे येत असताना लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखणे अतिशय आवश्यक आहे.  यासाठी कुटुंबनियोजन करणे  काळाची गरज आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन जितके महत्वाचे आहे तितकेच समाजातील प्रत्येक  कुटुंबाचे उज्वल  भवितव्य  घडविण्यासाठी  कुटुंब कल्याण  कार्यक्रमही तितकाच आवश्यक आहे.  जागितक लोकसंख्येच्या आकडेवारीत अग्रस्थानावर असलेल्या चीनचा लोकसंख्या वाढीचा दर भारतापेक्षाही कमी आहे. अनेक तज्ञाच्या मते २०२५ साली भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल.  चीनने राबविलेले  ‘हम दो हमारा एक’ हे कुटुंब नियोजनाचे धोरण यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या या धोरणाच्या धर्तीवर भारतानेही अनेक धोरणे,  योजना, कायदे आखले पण या सर्वांची अंमलबजावणी मात्र फार कमी प्रमाणात होताना दिसून येत आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रणाविषयीच्या सरकारच्या धोरणाचा,  योजनांचा  सन्मान ठेऊन त्या आचरणात आणणे ही प्रत्येक सुजाण  भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
                      सध्याच्या लोकसंख्येचे आकडे पाहिले तर मुलांचं म्हणजेच १५ वर्षाखालील व्यक्तींचं प्रमाण ३१ %, कमावत्या वयातील म्हणजेच १५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींची संख्या ६० % आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांची म्हणजेच ६० वर्षावरील व्यक्तींची संख्या ९% आहे.  भारताच्या लोकसंख्या वाढीतील जमेची बाजू जर कोणती असेल तर ती म्हणजे  तरुणांची वाढती संख्या. परंतु या नव्या पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी पुरवण्याची नितांत गरज आहे. जर या युवकांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळाला तर हीच वाढती लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासातील ओझं ठरणार नाही तर ती एक देशाची आर्थिक संपत्ती असेल असं म्हणायला काही हरकत नसावी असे  मला वाटते..

धन्यवाद....
✍✍✍पोपटराव यमगर
07709935374

मंगळवार, २८ जून, २०१६

..... जपानी माणसाची कविता......

(मला आवडलेली कविता. तुम्हालाही नक्की  आवडेल....... मी चार पाच दिवसापूर्वी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक निवड झालेले  मा. विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या सांगली येथे झालेल्या भाषणातून ही कविता ऐकली होती. )

To dream the impossible dream,
To fight the unbeatable foe,
To bear the unbearable sorrow,
To run where the brave dare not to go,
To love the pure and chest from a far,
To right the unforgivable wrong,
To try when your arms are too weary,
To reach that unreachable star,
This is my quest to follow that star,
No matter how place,no matter how far,
To fight for the right,without questions without pause
To be willing to march into hell for heavenly cause.

जे अशक्य वाटतंय
ते स्वप्न मला पहाचय...।
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्यास मला हरवाचय...।

कोणालाही सहन होत नाही
अस दुःख मला सहन कराचंय...।
ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाही ,त्या ठिकाणी मला जाऊन धावाचंय...।

ज्या वेळी माझे बाहू थकलेत ,
पाय थकलेत, हात थकलेत,शरीर थकलंय, त्या वेळेस मला,समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय ,
त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकायचंय...।

तो " स्टार " मला गाठाचाय ।
मला " सत्यासाठी "झगडायचंय संघर्ष कराचाय.।
कुठलाही प्रश्न मला त्यासाठी विचारायचा नाही । थांबा घ्यायचा नाही...।

माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे,
पण त्याला कारण हे " स्वर्गीय " असलं   पाहिजे...!

सोमवार, २७ जून, २०१६

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेला वारीचा सोहळा आजपासुन सुरु होत आहे. त्या निमीत्ताने✍✍✍

               महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. महाराष्ट्रासारखी संतांची परंपरा लाभलेला भूप्रदेश जगाच्या पाठीवर अन्यत्र सापडणे अशक्यच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पर्यंत संतांची महान परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली. "ज्ञानेश्वरे रचिला पाया। तुका झालासे कळस।।" या संतांनी आपल्याला केवळ ईश्वर भक्तीच शिकवली नाही तर मानवी जीवन उदात्तपणे जगण्याचे तत्वज्ञान त्यांनी महाराष्ट्राला शिकविले. आणि स्वतः तसे जगून दाखविले. वारीच्या माध्यमांतून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला, एकात्मतेची दिंडी निघाली, समतेची पताका खांद्यावर फडकली.  या संतांनी परकीय आक्रमणाच्या काळातही महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि स्वाभिमान याचे रक्षण केले.  एकीकडे संताच्या परंपरेतून निर्माण होणारा शुद्ध अध्यात्मिक भाव तर दुसरीकडे वीर पुरुषांच्या पराक्रमातून निर्माण होणारा वीर रस. यातून महाराष्ट्राचे एक अलौकिक व्यक्तिमत्व तयार झाले आहे.
                जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन  करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे पंढरीची वारी होय. 'ग्यानबा तुकाराम' हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र होय. आषाढची एकादशी जवळ येऊ लागली की आमच्या मनात  पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ निर्माण होते. आणि मग "पाऊले चालती पंढरीची वाट " अशी स्थिती निर्माण होते. आज जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहुहुन प्रस्थान होते आहे तर उद्या मंगळवारी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहुन प्रस्थान होत आहे.  त्यामुळे येणारे 15 ते 20 दिवस अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीच्या ज्ञानसागरात समरस झालेला आपणास  दिसुन येईल.
                 मला माझ्या मनामधे विठ्ठल भक्तीची ओढ ही अगदी लहानपणापासुनच  लागली. याचं कारण म्हणजे  माझ्या घरी असलेली वारकरी सांप्रदायाची परंपरा अर्थातच माझी आई धार्मिक वृत्तीची असल्याने घरातूनच लहानपणी मला अध्यात्मिकतेची ओढ निर्माण झाली. तसेच आमच्या गावात जरवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम  सप्ताह। या सप्ताहामधे  ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. यामुळे सहावी सातवीत असल्यापासुन मला ज्ञानेश्वरी वाचनाची सवय लागली. सुरवातीला ज्ञानेश्वरी त्यातील भाषा अवघड(काही संस्कृत शब्द) असल्याकारणाने काहीच समजत नव्हते पण पुढे पुढे बारावीनंतर ती हळु हळु समजु लागली. त्या सप्ताहाच्या वेळी सादर होणारे गोड आणि मधुर आवाजातील अभंग माझे नेहमी लक्ष वेधून घेत होते.  कदाचित मला वाचनाची आवडही यातुनच निर्माण झाली असावी असं मला  वाटतं. आज अनेकांना (मलाही)  कधी कधी बोलताना, लिहीताना भाषण करताना ज्ञानेश्वरी मधील ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खरंच मला तर नेहमी वाटत राहतं ते म्हणजे ज्ञानेश्वरी हाच महाराष्ट्राचा आद्यग्रंथ आहे. हा महाराष्ट्राचा आद्यग्रंथ अर्थातच विचार ग्रंथ जोपासण्याचा समाजात जगताना, वावरताना मनोमनी आपण प्रयत्न केला पाहिजे.
                या 20 दिवसाच्या चालणार्या वारी मधे लाखो वारकरी, हजारो दिंड्या सहभागी झाल्याचे आपणास दिसुन येतात. वारीच्या वाटेवर वारकरी हे नेहमी स्वयंशिस्तीने चालत असतो. अध्यात्म, एकात्म, भक्ती, भजन, अभंग यासारख्या अविष्कारातुन दिसणारी वारकर्यांची भावपुर्ण शिस्त तर दुसरीकडे वाटचाल, संयम, वारकर्यांचे परस्परांशी बोलणे, भोजन, कामाचे नियोजन, त्यासाठी योग्य व्यवस्थापन अशा स्वंयशिस्तीने प्रत्येक वारकरी हा वारी सोहळ्याशी बांधला गेला आहे.
लेखाचा शेवटही माऊलींच्याच एका गोड आणि  सुंदर अश्या अभंगाने करू इच्छितो .......,
              "अवघाचि संसार सुखाचा करीन।
                 आनंदे भरीन तिन्ही लोक।।
                जाईनगे माये तया पंढरपुरा।
                भेटेन माहेरा आपुलिया।।"

धन्यवाद।
✍✍✍✍✍✍श्री. पोपटराव यमगर
०७७०९९३५३७४
बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली

मंगळवार, २१ जून, २०१६

... आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी माझ्या लेखणीतून .... ✍✍✍✍

आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. योगा आणि योगासनांचे जीवनक्रिया विषयक महत्त्व यापूर्वी विविध योगतज्ज्ञ, मान्यवरांनी जागतिक समुहासमोर सातत्याने मांडले. योगाची ही जगातील स्वीकार्हता डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत १९३ देशांच्या प्रतिनिधींसमोर ‘योगा आणि योगासन’ याचे महत्त्व स्पष्ट केले. दि. ११ डिसेंबर २०१४ ला झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी जवळजवळ सर्व राष्ट्रांनी संमती दर्शवली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठरावाच्या बाजूने सकारात्मक मतदान होण्याची ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर ‘जागतिक योगदिन’ म्हणून नोंदला गेला. खरतर भारताच्या प्राचिन परंपरेत योग आणि योगासने ही भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती. भारतीयांच्या आचार, विचार आणि आचरणात योगा आणि योगासनांचा काही ना काही प्रकारे वापर होत असे. खालील कवितेच्या काही ओळींमधून फार सुंदर शब्दात योगाबद्दल समर्पक असं मांडलं आहे.

               "हर कोई योगा कर सकता है,
               छोटा, बड़ा, अमीर, गरीब।
               न औषधि की आवश्यकता है,
               न ही बीमारी आये करीब।
               भांति-भांति के आसन हैं,
               और भिन्न-भिन्न हैं नाम।
               शरीर के हर एक हिस्से को,
              मिलता इससे बहुत आराम।"

 आज आपण आपल्या वास्तववादी भारताकडे पाहायचं ठरवल्यास अलीकडे आपल्या देशात जुनं ते सगळं बुरसटलेलं आहे, टाकून देण्याच्या लायकीचं आहे अशी समाजमनामध्ये भावना झालेली दिसून येते. परंतु जुनं ते सोनं असही न म्हणत बसता, आपल्या संस्कृतीत ज्या प्राचीन चांगल्या परंपरा आहेत त्या खुल्या मनानं स्वीकारणं आणि नको असलेलं काढून टाकून नव्या उमेदीने आधुनिक जगात जगताना चांगले ते बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे असे मला ठाम पणे वाटते. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याचा तुमच्या माझ्यासह सर्व भारतीयांच्या मनात नक्कीच आनंद असला पाहिजे. आज जगभरातील राजकीय आणि सामाजिक चालू घडामोडींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसून आल्याशिवाय राहत नाही ती म्हणजे जगभरातील देशांच्या संस्कृती-संस्कृती मधील चालू असलेला संघर्ष.याविषयावरतीही लिहीण्याची खूप इच्छा आहे) मला तर आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी ११ सप्टेंबर १८९३ ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण याचदिवशी अमेरिकेतील शिखागो येथील सर्वधर्मपरिषदेत विश्वविजयी विचाररत्न स्वामी विवेकानंदजी यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि महिमा जगभरातील जमलेल्या विचारवंत आणि महंत यांना भारतीय शब्दात त्यांच्या वाणीतून फार थोडक्या शब्दात समजावून सांगितला. त्यानंतर त्यांनी समस्त भारतीयांना एक संदेश दिला तो म्हणजे "जा, साऱ्या जगाला सांगा, ही पुण्य पुरातन भारत भूमी पुन्हा एकदा जागी होत आहे". विवेकांनदजींच्या वाणीतून जगाला भारतीय संस्कृती श्रेष्ठ वाटू लागली. आणि आजच्या वर्तमानात जगताना सुद्धा आपली भारतीय संस्कृती जाणून घेण्यात समस्त जगाला रस वाटतो आहे. मुळात आपला भारतीय विचारच सहिष्णुताशील विश्वबंधुत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊलीनीही १३ व्या शतकात मांडलेल्या पसायदानातुनही विश्वकल्याणाचे विचारच सर्वकाही सांगून जातात.

    सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन या सर्वांमुळे आपल्या दैनदिन जीवनात होणारे आरोग्यदायी फायदे यावरती आज सर्व वर्तमानपत्रातून, माध्यमांतून चर्चा चालू आहे, होत आहे. त्यामुळे यावरती मी जास्त लिहिणार नाही. फक्त मी एवढेच सांगू इच्छितो की, ते म्हणजे आपल्या निरोगी आरोग्यासाठी दररोजची फक्त ४० मिनिटे सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने यासाठी दिली पाहिजेत. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता तर वाढतेच वाढते पण दिवसभराच्या धकाधकीतून काम करत असताना आलेला थकवा, आळस झटकून टाकण्यास मदत होते. शेवटी आपण म्हणतोच ना, "शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, शत्रु-बुद्धि विनाशायः, दीपःज्योति नमोस्तुते!"
         आताच्या काळात योगाला आलेलं महत्व ते कमी होऊ न देता उलट ते दिवसेंदिवस वाढतच राहावं हीच आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी माझ्या विचारी मनाची एक सदिच्छा ...।

धन्यवाद...
✍✍✍✍ पोपट यमगर…

गुरुवार, ९ जून, २०१६

                                      महाराष्ट्रात येणाऱ्या चार ते पाच दिवसात मान्सून पाऊस  येउन धडकेल असा  भारतीय हवामान शास्त्र विभाग(IMD) आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज या दोन्हीही नामवंत संस्थांनी व्यक्त केला आहे. हि नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या साठी तसेच शेतीमालावर आधारित असलेल्या सर्व उद्योगासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशांत महासागरात एल निनो च्या प्रवाहामुळे महाराष्ट्रासह देश मोठ्या दुष्काळाला सामोरे जातो आहे. अर्थात  एल निनो च्या प्रवाह कमी झाल्यामुळे नक्कीच यावर्षी चांगला पाऊस पडण्याची आशा निर्माण झाली आहे. जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करून हि आमच्या सरकारी व्यवस्थापन यंत्रणेने आपत्तीपूर्व नियोजन केल्याचे पहावयास मिळत नाही. म्हणजेच एखादी घटना घडल्यानंतर आपली व्यवस्था धावाधाव सुरु करते असा आजपर्यंतच्या अनेक उदाहरणामधून आपणास दिसून येते. येणाऱ्या काळात अश्या घटना घडूच नयेत आणि समजा घडलीच तर  त्या आपत्ती साठी आपली आपत्तीपूर्व यंत्रणा सक्षम आणि तत्पर असली पाहिजे. दुष्काळासारख्या समस्येवर  हि दरवर्षी तात्पुरत्या स्वरुपाची उपाययोजना आपले सरकार करत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन मनात ठेऊन दुष्काळासारख्या समस्येवर सरकार उपाययोजना करत असल्याचे मला तरी दिसून येत नाही. (अर्थात पुढील निवडणुकां कोणत्या प्रश्नावर लढवायच्या???? हाही प्रश्न राज्यकर्त्यांना महत्वाचा वाटतो.)
                                        महारष्ट्रातील मराठवाड्यासह, पश्चिम महारष्ट्रातील माणदेशात (सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील  काही तालुके) पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. पिण्यासाठीच पाणी नसेल तर मग शेती, उद्योगधंदे यासाठी तर पाणी मिळणेच मुश्किल अशी वास्तविक  परिस्थिती अनेक गावामध्ये होती.    भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD)  आणि स्कायमेट या प्रसिद्ध हवामान संस्थाचा अंदाजामुळे सकारात्मक दृष्टीकोनातून आपल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
      ‘ठायीठायी थेंब सांडले आमच्या घामाचे, कधी न कोणी मोल मोजले आमच्या घामाचे, सुपीक सारे शेतशिवारी आम्हीच करणारे, कष्टाने कोठार धान्याचे आम्हीच भरणारे.' या आशेने जगाच्या पोठाची भूक भागविणारा म्हणजेच जगाचा पोशिंदा असणारा शेतकरीराजा आभाळातून कधी पावसाच्या सरी बरसतात याची वाट पाहतो आहे. आभाळाकडे डोळे लावून तो वरूण राजाला विनवणी करतो आहे कि,
                                     "पावसांच्या धारांनो या, करपलेल्या पिकाला नवजीवन द्या. या थुई थुई थुई थुई धारा, हा शिवार फुलवा सारा "


धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

मंगळवार, ७ जून, २०१६

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या ताज्या अपघातात १८ जणांचे प्राण गेले. आतापर्यंतच्या अनेक अपघातांप्रमाणे हा अपघातही भरधाव आणि काळजाला धडकी भरवणारा असाच होता. आजकाल इतके चांगले रस्ते तयार झाले असूनही मानवी चुकामुळे अपघातांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच अपघाताताबद्दल व्यवस्थेवर तसेच वाहतुकीचे नियम न पाळणार्या नागरिकांच्यावर आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात सणसणीत प्रहार केले आहेत वेळ मिळाल्यास आपण हा अग्रलेख आवर्जुन वाचावा असाच आहे.(खरेतर लोकसत्ताचे सर्वच अग्रलेख योग्य जागेवर मार्मिक बोट ठेऊन केलेले सणसणीत आणि झणझणीत प्रहर असतात. मला तर खूप आवडतात.) आजच्या अग्रलेखातील शेवटचा परिच्छेद आपल्या वाचनासाठी मी मुद्दामहुन देत आहे.
"वास्तविक इतकी सरकारी अनास्था ज्या समाजात असते तो आपल्या हिताविषयी अधिक सजग हवा. परंतु येथील परिस्थिती बरोबर उलट. सरकार ढिम्म आणि नागरिक स्वत:च्याच मस्तीत. त्यात नियम पाळणे म्हणजे कमीपणा असे मानणारा एक मोठा वर्ग. हाती पैसा आहे म्हणून सर्व काही घ्यावयाचे, पण ते वापरावे कसे याचे ज्ञान शून्य. उत्तम फोन आहेत, पण ते वापरण्याची संस्कृती नाही. मोटारी आहेत, पण त्या कशा वापराव्यात हे यांना माहीत नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही. अशा परिस्थितीत रविवारसारखे अपघात हे नवीन नाहीत आणि ते जुनेही होणारे नाहीत. समाजच्या समाज जर इतका अज्ञानी आणि असंस्कृत असेल आणि त्यास तितक्याच बेजबाबदार व्यवस्थेची साथ असेल तर हे असेच होत राहणार
आणि रस्त्यांवरची ही अशी (अपघात) कार्ये रोखायला ‘श्री’ देखील असमर्थच असणार".

धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर

(संदर्भ :- लोकसत्ता वर्तमानपत्र…)

शनिवार, ४ जून, २०१६

भारतीय राज्यघटने आपल्याला अनेक  अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील तिसर्या भागामध्ये कलम १२ ते ३५ मध्ये हे सर्व अधिकार/ हक्क दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील चौथ्या भागामध्ये कलम ५१ अ मध्ये मुलभूत कर्तव्ये दिली आहेत.  आपण नेहमी आपल्या हक्कांचा विचार करतो. (उदा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य) मुलभूत हक्कांचा विचार करत असताना आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये हे  विसरून जातो. मला वाटतं अधिकार आणि कर्तव्ये हि एकमेकांच्या हातात हात घालून जातात . जेवढे अधिकार महत्वाचे असतात  तेवढीच कर्तव्ये देखील असतात. घटनेच्या कक्षेत राहून जगायचे, विचार मांडायचे, बोलायचे,  म्हणजे फक्त आणि फक्त अधिकारच चालवायचे नाहीत तर 
कर्तव्ये काय आहेत हे समजून घेऊन ती आचरणात आणली पाहिजेत. आपणा सर्वांचे कर्तव्य हे आहे की या देशात विचारांची विविधता आहे हे आधी मान्य करणे. नंतर माझा जसा विचार आहे तसाच समोरच्या व्यक्तीचा असेल किंवा असलाच पाहिजे अशी मनोभुमिका किंवा असा आग्रह  मी ठेऊ नये. समोरच्याचा विचार समजून घेण्याची भूमिका मी ठेवली पाहिजे. समोरच्याला न दुखावता आपला असा वेगळा विचार त्याच्यापर्यंत ठामपणे  पोहोचवता आला पाहिजे. पण तो विचार ऐकताना समोरच्याची भूमिका हि कोणत्याही विषयाच्या बाबतीत  पूर्वग्रह दुषित असू नये. हाच समग्र विचारांचा पाया आहे असे मला नेहमी वाटत राहतं…

धन्यवाद …
✍✍✍✍पोपट यमगर

शुक्रवार, ३ जून, २०१६


                       आज समाजाच्या मनावर, विचारावर माध्यमाचं(Media) वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मी  वर्चस्व वाढत आहे असं म्हटले, याचं  कारण म्हणजे एखादी बातमी दाखवताना त्या बातमीला इतक्या आक्राळ विक्राळ स्वरुपात दाखवली जाते कि त्या बातमीचा परिणाम हा समाजमनावरती खूप मोठ्या प्रमाणात पडला जातो किवां पडत आहे. एखादी घटना घडली रे घडली कि त्या घटनेची  पूर्ण सत्यता न तपासता त्याची पहिली बातमी आपल्या चनेल वर येण्यासाठी किवा सनसनाटी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप गडबड करून ती बातमी दाखवली जाते. काही वेळा एखादी नकारात्मक बातमी चानेलच्या TRP साठी  इतक्या वेळा दाखवली जाते कि त्याचा नकारात्मक परिणाम समाजावर पडत असतो हे ना रिपोर्टरला समजते, ना संपादकाला… 
                            आज आपण बातम्या चे चानेल लावले कि काय बातम्या असतात?? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या बातम्या असतात नाहीतर राजकारणातील दररोजची एकमेकावरील चिखलफेक (निवडणुकीतील आश्वासनावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच असेल कदाचित) ,त्यातही चघळून चघळून चोथा झालेल्या टीका, भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या, राजकीय नेत्यांची चानेल च्या कार्यक्रमातील वाद्ग्रात वक्तव्य, गुंडगिरी, सेलिब्रेटीज च्या प्रकरणाचे रेपोर्ट,  बलात्काराच्या बातम्या, फसवणुक दरोड्याच्या बातम्या  त्यातच निम्याहून जास्त जाहिराती असतात. अर्थात त्या बातम्या चानेल वर  येतात म्हणजे समाजामध्ये घडत आहेत हे खरंय पण त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या दाखवून एकप्रकारे समाजाच्या मनामध्ये नकारात्मक विचार पेरतात कि काय असं मला नेहमी वाटत राहतं. मला चानेलवरील दररोजच्या नवीन विषयावरील  वरील विशेष  चर्चा ऐकायला खूप आवडतात. मी घरी बातम्यांचा चानेल लावला कि लगेच माझ्या घरातून विरोधात्मक सूर येतो  कारण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चालत राहणाऱ्या, त्याच त्याच चघळून चोथा झालेल्या बातम्या ऐकायला आणि पाहायला हि नकोश्या वाटतात.
                  माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. लोकशाहीचा चौथा स्तंभाने जागरूकतेने समाजातील चांगल्या घटनावर लक्ष केंद्रित करणं करणं गरजेचं आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना सर्वांच्या पर्यंत माध्यमेच पोहचू शकतात. सरकार आणि जनता यांच्या मधील दुवा म्हणून माध्यमांनी कार्य केलं पाहिजे.   २०१४ मधील निवडणुकातील माध्यमांची भूमिका ही खूप महत्वाची ठरली होती.  सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात माध्यमांची भूमिका खूप महत्वाची ठरत आहे. अर्थात माध्यमांची भूमिका महत्वाची असली पाहिजे यात नक्कीच दुमत नाही पण ती सकारात्मक आणि चांगल्या समाजासाठी असावी शेवटी एवढीच  माझ्या विचारी मनाची एक छोटीशी इच्छा…

धन्यवाद…

✍✍✍✍पोपट यमगर…
popatgyamgar.blogspot.com

सोमवार, ३० मे, २०१६

रणरागिणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ……

                                                    
             अठराव्या शतकाच्या इतिहासाच्या पानावर स्वबळावर, स्वकर्तृत्वावर राज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच मल्हार रावांच्या मार्गदर्शनाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमतः त्यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन।।
             31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास आलेल हे धगधगत क्रांती रत्न म्हणजेच अहिल्यादेवी होळकर..  ज्या वयात मुली बाहुली-बाहुली चा खेळ खेळणे पसंद करतात, त्या वयात घोड्यावर बसुन रपेट मारणे,तिरंदाजी करणे, तलवार चालविणे या सार्या गोष्टी छोट्याशा अहिल्येस  प्रिय होत्या. अशा युद्धनितीचा प्रभाव बालपणीच अहिल्यादेवींच्या मनावरती पडला होता. त्यातच त्यांच्या मातोश्री सुशिलाबाई ह्या धार्मिक असल्यामुळे अहिल्यादेवींना मानपान, सन्मान देणे,कार्यनिष्ठा, संयमि वृत्ती,सोज्वळता तथा निर्मळता हे अंगवळणीच पडले होते. अशा दुहेरी संस्कारांच्या गर्तेत अहिल्याराणी घडल्या होत्या.  असेच एकदिवस बाजीराव पेशवे आणि मराठ्यांचे  लढवय्ये शुरसरदार मल्हार राव
होळकर  वेशपालटुन फिरतीवर असताना अहिल्यादेवींशी त्यांची  गाठ पडली. पहिल्याच नजरेत त्या कोवळ्या अहिल्येने त्यांना जरब देऊन तुम्ही व्यापार्याच्या सोंग घेऊन आलेले सोंगी असुन मल्हार रावांचे खरे रूप ओळखले. तसेच मल्हाररावांनी अहिल्येस तिरंदाजी करून समोरील झाडावरचा पक्षी मारण्यासाठी सांगितला. .तेव्हा अहिल्यादेवी उदगारल्या,
   "आम्ही कोण्या मुक्या प्राण्यावर व गरिबांवर हल्ला करून आमची शुरता सिद्ध करत नाही आणि पक्षी तर आमचे पाहुनेच मग त्यांचा तर सन्मान करायला आमच्या मातोश्रींनी शिकविले आहे, संहार नाही"
             त्या प्रसंगाने मल्हारराव अचंबित झाले आणि  अशी शुरकन्या जर आपली सुन जाहली तर ...????? या विचाराने मनोमन सुखावले.  सन 1733 साली अहिल्याराणीचा विवाह मराठ्यांचे शुरसरदार मल्हारराव-गौतमाबाई होळकर यांचे एकुलते पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी पार पडला.
             राज्याची महाराणी म्हणुन प्रतिकुल परिस्थितही काम करत असताना अहिल्यादेवींनी आपला संयम व प्रजेच्या काळजीखातीर कुठलेही भावनात्मक पाऊल उचललेले नाही, कारण खुःद अहिल्यादेवी भावनेपेक्षा कर्तृव्याला श्रेष्ठ माणनार्या होत्या. त्यामुळे आजच्या माता भगिनींनी लहान लहान गोष्टीवरून चिडचिडपणा करून थेट भांडण, घटस्फोट,सासु सासरे वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्यार्या मालिका पाहण्यापेक्षा टीव्हीचे रिमोट बाजुला करून कधीतरी बुद्धीची भुक भागविण्यासाठी  अहिल्या-जिजाऊ-सावित्री-झाशीची राणी वाचल्या पाहिजेत. 
           अहिल्यादेवीनी त्यांच्या स्वराज्यात अनेक लोककल्याणकारी कामे केलेली आपणास पहायला मिळतात. या देशातील अनेक मंदीरे, धर्मशाळा, अन्नछत्रे,वृक्ष संवर्धन, विहिरी, पाण्यचे कुंड असे अनेक लोकहितकारी कार्य केली आहेत. त्यांच्या कालखंडात तर झाडतोड ही अदखलपात्र गुन्हा होता. त्यांनी नदीच्या मुख्य प्रवाहापासुन अनेक कृत्रिम प्रवाह निर्माण करून ऊजाड ठिकाणी पाणी पोहेचवुन शेतकर्यांना शेती करण्यासाठी पाणी ऊपलब्ध करून दिले. तसेच शेतकर्यांना वेळेप्रसंगी शेतसारा मध्ये योग्य ती सवलत देऊन शिवरायांच्या शेतकरी प्रती धोरणांचा अवलंबही केला होता. आजही माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत. तेथे  वस्त्र ऊद्ध्योगासाठी अहिल्यादेवीनीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्ध्योगास चालना दिली होती. अहिल्यादेवीने "ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे. तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो" या विचाराच्या आधारे तत्कालीन व्यवस्थेला जबरदस्त 'चपराक' लगावली होती. अहिल्यादेवींनी रणांगणातील लढाईत शक्तीच्या जोरावर अनेक शत्रुंना नामोहरण केले होते, त्याचबरोबर  बुद्धीच्या बळावर अनेक लढायात चित्तपटही केले होते. अहिल्यादेवींनी सती प्रथा,बालविवाह, व विधवांसाठी विशेष योजना राबवुन अन्यायकारी व्यवस्थेस लाथाडले होते. अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचे  सर्वसमावेशक विचार आणि पराक्रमाचा इतिहास आपणासारख्या सुशिक्षीत तरुणांनी निरपेक्षपणे जाणुन घेऊन तो जाज्वल्यप्रेमी इतिहास तळागाळातील समाजाच्या अशिक्षीत, शोषित,  वंचित घटकापर्यत पोहचविणे हीच आजच्या काळातील खरी गरज आहे असं मला वाटतं.
           एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या 'कॅथरीन द ग्रेट, पहिल्या एलिझाबेथ, मार्गारेट' म्हटले आहे. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस वसलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.  मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे जवळ जवळ ३० वर्षे  त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
           लेखाच्या शेवटी विनया खडपेकर यांच्या 'ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती  दिलेली एक कविता आठवते. या कवितेतुन विनया ताईंनी नक्कीच अहिल्यादेवीच्या कार्याचा फार थोड्या शब्दात खुप मोठा गौरव केला आहे असं मला वाटतं.

"ती सत्ताधारी होती,पण ती सिंहासनावर नव्हती.
ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा
सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा-तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले.
तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.
तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.
मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिलाही माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या
चांदणीसारखी लुकलुकली."

धन्यवाद.....
✍✍✍✍ पोपट यमगर

शनिवार, २८ मे, २०१६

स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती त्यानिमीत्त................

            आज स्वांतत्र्यवीर सावरकर यांची 133 वी जयंती। त्यानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। स्वांतत्रवीर सावरकर म्हटले की आपल्याला आठवतात ते क्रांतीकारक सावरकर. भारताच्या स्वांत्र्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणारे सावरकर. काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले सावरकर, अंदमान तुरुंगातील छळाला निर्भीड सामोरे गेलेले सावरकर.. साहित्यीक विज्ञानवादी सावरकर... सावरकरांच्या जीवनात अदभुत पराक्रम, अस्सीम त्याग, राष्ट्रनिष्ठा, असामान्य वक्तृत्व, हिंदुत्व, अस्पृश्यता निवारण, विज्ञाननिष्ठा हे सर्व सामावलेले आहे. त्यांच्या आयुष्यात भरपुर दुःखप्रद कारावास, हालाखीचे जगणे, देशासाठी केलेला अस्सीम त्याग आहे. तरीही एका असामान्य व्यक्तीचा जीवनाशी झालेला हा लढा आहे.
           सावरकरांनी वयाच्या १४व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरातील अष्टभूजा देवीपुढे ‘मी या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मारिता मारिता मरेतॊ झुंझेन’ अशी शस्त्र क्रांतीची शपथ घेतली. या घटनेचे मूळआई-वडिलांच्या आदर्शात व त्यांच्याकडुन होणार्‍या संस्कारांमध्ये दडलेले होते असे दिसून येते. सावरकरांचे एकुण जीवनच आपल्या सारख्या तरुणांना भारावुन टाकणारे आहे. आजच्या काळात अनेक संकुचित विचार असणारे लोक स्वांतत्रपुर्वकाळातील महापुरुष, क्रांतीकारक,सामाजिक राजकीय नेते यांची एकमेकांशी तुलना करतात. एकमेकांना त्यांच्या नावाप्रमाणे विभागण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच ही एक मनातील बोचरी खंत आहे. एकमेकांशी तुलना न करता सर्व महापुरुषांनी देशासाठी, समाजासाठी केलेलं कार्य, त्यांचे विचार आपण समजुन घेतले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारामध्ये मतभेद जरुर होते पण त्यांनी ते मतभेद देश हिताच्या आड येऊ दिले नाहीत... त्यांनी राजकीय स्वांतत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यांना अंदमानमधील तुरुंगात कोणत्याही सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत, म्हणून 'कमला' हा काव्यसंग्रह एका अणकुचीदार खिळ्याने भिंतीवर लिहुन तो पाठ करणारे सावरकर हे पहिलेच कैदी होते. ते एकदा म्हणाले होते, "माझी अशी इच्छा आहे की, मी
सागरात उडी टाकली होती ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने नेहमी स्मरण ठेवावे." अर्थात त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार एक समंजसवादी सुशिक्षीत युवक म्हणुन जाणुन घेणं हीच आजच्या काळातील गरज आहे, असं मला ठामपणे वाटतं.

✍✍✍✍✍✍पोपट यमगर… ………

शुक्रवार, २७ मे, २०१६

वाढदिवसाच्या निमित्ताने

        आज माझ्या वाढदिवसानिमित्त अगदी सकाळपासून दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, मित्र, मैत्रिणी, या सर्वांनी  शुभेच्छा दिल्या त्याबद्दल  त्या सर्वांना शतशः धन्यवाद देतो…आपल्या शुभेच्छानी नक्कीच भाराऊन गेलो आहे.  वाढदिवसाच्या निमित्ताने  मागील आयुष्याचं अभिष्टचिंतन करत पुढील आयुष्याकडे सकारात्मक ध्येयासक्त नजरेने पाहतोय… आज खूप जणांनी शुभेच्छा देत असताना  चांगले लेख वाचायला मिळोत या सह खूप अशा सदिच्छा हि व्यक्त केल्या. अर्थात या सर्व सदिच्छा पुढील वर्षभरात पूर्ण करणं हे माझे कर्तव्य आहे, आणि त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन…
       वाढदिवसानिमित मी हि काही चांगले संकल्प केले आहेत.   शैक्षणिक  पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे हे माझे धेय्य आहे. लेखना बरोबरच भाषण कोशल्य हि आत्मसात करण्याची इच्छा आहे. यासह खूप सारे संकल्प मनात आहेत. ते संकल्प येणाऱ्या काळात मी माझ्या आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. पुनश्च एकदा सर्व प्रेमळ मित्रांचे आभारी आहे…असंच आपले मित्रवत प्रेम कायम राहावं हि माझी आजच्या वाढदिनी आपणा सर्वाकडून एक सदिच्छा आहे.
धन्यवाद…।

✍✍✍पोपट यमगर…

गुरुवार, २६ मे, २०१६

                           केंद्रामधील   NDA (भाजपच्या) सरकारला आज दोन वर्षे पूर्ण  होत आहेत.  सकाळी वर्तमानपत्र उघडल्या उघडल्या केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जाहिराती(अर्थात मोदिजींच्या खूप मोठ्या छबीसह… माझा देश  बदलतो आहे.... पुढे  जातो आहे  ) पहिल्या पानावरतीच आलेल्या पाहिल्या. त्या  पाहत असतानाच थोडेसे पाठीमागील दोन वर्षाच्या काळात डोकाऊन पाहिले…२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी  भाजपला मोठ्या अपेक्षेने दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनावर बसवले होते. मागील  10 वर्षातील काॅग्रेसचा नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुन देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किवा नरेंद्र मोदीजी यांच्या  सक्षम नेतृत्वाकडे पाहून जनतेने भाजपला मतदान केले होते. समाजातील सर्व घटकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत असे सध्या तरी म्हणता येणार नाही. अर्थात सर्वच अपेक्षा दोन वर्षाच्या काळात कोणतच सरकार पूर्ण करू शकणार नाही हे हेही त्रिवार सत्य आहे. सकारात्मक  दुर्ष्टीकोनातून पहिले तर त्या अपेक्षा काही प्रमाणात तरी सरकारने पूर्ण केल्याही आहेत असं म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते. 
                         पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या नेत्तृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनामध्ये उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया, स्टन्ड अप इंडिया' 'डिजीटल इंडिया' , तरुणांमध्ये कौशल्य निर्मितीसाठी 'स्कील इंडिया', शहरांच्या नवनिर्माणासाठी 'स्मार्ट  सिटी, स्वच्छतेसाठी 'स्वच्छ भारत', शेतकर्यासाठी 'प्रधानमंत्री जन धन योजना' मुलीसाठी 'बेटी बचावो बेटी पढाओ' आणि  'सुकन्या समृद्धी योजना' गरिबांसाठी 'अटल पेन्शन योजना','प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना'  यासह सर्व क्षेत्रातील अनेक योजनांचा समावेश होतो. या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात त्याचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे. आपल्याकडे अनेक योजना खूप चांगल्या असतात पण त्या योग्य अंमलबजावणी अभावी तशाच पडून राहतात किवा त्याची माहिती सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. सरकार ज्या योजना आखतम त्यातील बर्याच योजना ज्यांच्या साठी आखत असते  त्यांनाच त्या योजनाची माहिती मिळत नाही हि वस्तू स्थिती आहे. अर्थात अलीकडील काळामध्ये माध्यमातील वाढत्या जाहिरातीमधून हि माहिती गावातील घराघरामध्ये पोहचते हि एक सकारात्मक बाब आहे.
                        देशाचा आर्थिक विकासाचा दर GDP  ७.५% आहे. म्हणजेच जगातील अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची  अर्थव्यवस्था  वेगाने बदलत पुढे  जात आहे.  गेल्या दोन वर्षातील मोदिजींच्या परराष्ट्रीय धोरणामुळे नक्कीच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा चांगली होत असल्याचे आपल्याला दिसून येईल…
                         भारतातील सर्व काही समस्या संपल्या असेही म्हणता येणार नाही. समस्या अडचणी ह्या आहेतच. देशासमोर दुष्काळ, दहशतवाद, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, जातीयवाद यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.  यावरती सकारात्मक तोडगा काढण्याचे काम केंद्रात बसलेले सरकार करत आहे. 

✍✍✍✍✍✍पोपट यमगर

बुधवार, २५ मे, २०१६

वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश....................

      एकदा सुर्यास्ताच्या वेळेला सुर्याने सर्व दिव्यांची सभा बोलावली, आणि विचारले की, "मी तर अस्ताला चाललो, उद्या उगवून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल??" सगळ्या दिव्यांची छाती दडपली, हा साक्षात सुर्यनारायण त्याची एवढी ताकद आणि हा म्हणतो माझ्या अनुपस्थितीमधे जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल?? सगळे गप्प बसले. एक छोटी टिमटिमती पणती होती. ती घाबरत घाबरत पुढे सरकली. सुर्याला वंदन करुन म्हणाली, "सुर्यनारायणा जगाला प्रकाश देण्याचे मला माहित नाही, माझ्यापरीने जळत राहण्याचं काम मी करीन." यावर सुर्य म्हणाला,"अस्ताला जायला मी मोकळा झालो."
        वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत भाषांतर केलेला सारांश… या कवितेच्या सारांशमधुन जितके आपण चिंतन करू तितकं कमी आहे, उलट यामधून मिळणारा अर्थ उत्रोत्तर वाढतच जाईल यामध्ये माझ्या मनामध्ये तरी कोणतीच शंका नाही. आपण दररोज एकतो, पाहतो, वाचतो कि सध्याच्या वर्तमान युगामध्ये सगळीकडे अंधाधुंदी चालू आहे. माझे जवळचे अनेक मित्र मी लिहित असलेल्या छोट्या छोट्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हणतात कि तुझ्या या लेखनामुळे समाजावर काय फरक पडणार आहे. यामुळे माझ्या मनामध्येही नकारात्मक विचार येतात पण वरील सरांशमधील पणतीने दिलेल्या उत्तरातून खूप काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. आम्ही म्हणतो हे सर्व बदलेल केव्हा???? तेव्हा सगळे बदलेल केव्हा हे मला माहित नाही, माझ्या परीने त्या छोट्यास्या पणतीप्रमाणे जळत राहण्याचे कार्य मी करेन असं जेव्हा आपण म्हणायला लागू तेव्हा नक्कीच परिवर्तन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल…
धन्यवाद……

(✍✍✍✍✍✍ मनाच्या गाभार्यातून .................. )

मंगळवार, १७ मे, २०१६

✍✍✍✍सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या नीट परीक्षेच्या सक्तीवरून चाललेल्या वादासंदर्भात माझं ही मत ✍✍✍✍✍✍

            सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी  नीट परीक्षेच्या सक्तीवरून महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या  नीट परीक्षेच्या सक्तीविरोधात जवळ जवळ सगळेच राज्यकर्ते  विद्यार्थ्याच्या हितासाठी (???????) मैदानात उतरले आहेत. लोकसत्ताच्या १५ मे च्या वर्तमान पत्रामध्ये लोकसत्ताच्या जेष्ठ पत्रकार रेश्मा शिवडेकर यांची 'नीट मुळे शिक्षण सम्राटांचे अर्थकारण कोलमडले'  हि बातमी वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांना विद्यार्थ्यांचे नेमके कोणते  हित जोपासायचे आहे हे  लक्षात येईल. MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी काही आर्थिक संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी काही शिक्षण सम्राटांच्याकडे आर्थिक लॉबिंग कसे लावले आहे हे हि या बातमीत चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे.   आज  शिक्षणासारख्या ज्ञान देणाऱ्या पवित्र क्षेत्रात  लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा  विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही. MBBS, BDS हे वैद्यकीय कोर्स झाल्यानंतर होणारा डॉक्टर हा तज्ञच असला पाहिजे तसेच हुशार असूनही येथील शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणसम्राटांच्या वर्चस्वामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. आम्ही तज्ञ आणि गुणवंत डॉक्टर घडविण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घातलेले पैसे पुन्हा उकळणारे डॉक्टरच तयार करत आहोत कि काय?? असा प्रश्न माझ्या विचारी मनाला पडल्याशिवाय राहत नाही.
          केंद्रीय पातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट हि परीक्षा घेतली जात होती.  पण गेली काही दिवस  सध्या ती परीक्षा बंद होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा त्या चालू होणार आहेत. नीटसाठी ११ वी आणि बारावी NCERT   अभ्यासक्रमावर आधारित हि परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील CET हि परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते.  सध्या नीट या परीक्षेसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध नाही हि वास्तविक परिस्थिती आहे. ते अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याएवजी आपले महाराष्ट्र सरकार  नीट परीक्षा सक्ती रद्द करण्यासाठी केंद्राच्या मदतीने अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. कदाचित तो अध्यादेश येण्याची दाट शक्यता मला वाटते आहे.  तो अध्यादेश येउन नीट परीक्षा बंद होतात कि नाही ??? विद्यार्थ्यांचे ( शिक्षण सम्राटांचे) हीत जोपासले जाते कि नाही???? हे पाहणे आपणासाठी ओत्सुक्याचे ठरेल.

✍✍✍✍पोपट यमगर
आटपाडी, सांगली
popatgyamgar.blogspot.com